Advertisement
नवी दिल्ली : बारावीची बोर्ड परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या करिअरचा आलेख आणि आयुष्यातील रोडमॅपमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. पण करोना परिस्थितीत विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेणे हे एक मोठे आव्हान असल्याचे केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी म्हटले आहे. बारावीची परीक्षा ही विद्यार्थ्याचे मूल्यांकन, गुणवत्ता, करिअरची निवड करण्याची पहिली पातळी आहे. इथून विद्यार्थ्यांचे उच्च शैक्षणिक ध्येय ठरत असल्याचे ते म्हणाले. विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि कल्याण ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. मी सर्व विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना आश्वासन देतो की, कोणत्याही निर्णयाचा विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि त्यांचे भविष्य यांना सर्वोच्च प्राधान्य राहील असे ते म्हणाले. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने(CBSE) घेतलेल्या बोर्ड परीक्षा या ‘अखिल भारतीय पात्र’ असतात. विविध राज्यांतील उच्च शिक्षण संस्था बारावीच्या गुणांवर आधारित पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश देतात असे ते पुढे म्हणाले. बारावीच्या बोर्ड परीक्षा आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेबाबत चर्चा करण्यासाठी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव आणि राज्य परीक्षा मंडळाचे अध्यक्ष आणि भागधारक यांच्यासोबत २३ मे रोजी उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल, केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी आणि केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मर्यादित परीक्षा ठेवणे हा उत्तम मार्ग आहे. परीक्षेची प्रक्रिया सुरू करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला पाहिजे. तरच आपल्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेणे शाळा प्रशासनासमोरील आव्हान कमी करेल, यावर सर्वांचे एकमत झाल्याचे शिक्षणमंत्री म्हणाले. पोखरियाल यांनी गेल्यावर्षीच्या करोना संकटातील आ्व्हानांकडे लक्ष वेधले. देशाने बोर्ड परीक्षा यशस्वीरित्या घेतल्या. तसेच जेईई आणि एनईईटीसारख्या प्रवेश परीक्षांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये २१ लाखाहून अधिक विद्यार्थी हजर होते असे ते म्हणाले. करोनामुळे विद्यार्थ्यांचा एक गट बोर्ड परीक्षेत बसू शकत नाही या वस्तुस्थितीचा विचार केला जातोय. दुसऱ्या टप्प्यात परीक्षा घेताना सुधारित परिस्थितीत विद्यार्थ्यांना अतिरिक्त संधी मिळेल असे ते म्हणाले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ux50P4
via nmkadda