Advertisement
सीबीएसई बोर्डाच्या (CBSE) बारावीच्या परीक्षांसंदर्भात अंतिम धोरण तयार होत नाही तोपर्यंत शाळा त्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा (Std XII practical exams) प्रलंबित ठेवू शकतात, असा पर्याय बोर्डाने शाळांना दिला आहे. काही शाळा कोविड-१९ संक्रमण काळातही विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये बोलावत असल्यामुळे पालकही नाराज होते. सीबीएसई बारावीची लेखी विषयाची परीक्षा यापूर्वीच रद्द झाली होती, पण प्रात्यक्षिक परीक्षांबाबत कोणत्याही सूचना बोर्डाने दिल्या नव्हत्या. प्रात्यक्षिक परीक्षांबाबतचा निर्णय शाळा त्यांच्या पातळीवर घेऊ शकतात, अस सीबीएसई बोर्डाचे परीक्षा नियंत्रक सन्यम भारद्वाज यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले. आम्ही प्रात्यक्षिक परीक्षांसंबंधीचा निर्णय घेणार आहोत, तोपर्यंत शाळा या परीक्षा प्रलंबित ठेव शकतात. सीबीएसई ऑफलाइन प्रात्यक्षिक परीक्षांसाठी काही पर्यायी पद्धत आणण्याचीही शक्यता आहे. या परीक्षा कशा पद्धतीने घ्यायच्या याबाबतची चर्च सुरू आहे, असेही भारद्वाज म्हणाले. दुसरीकडे, शाळा मात्र द्विधा अवस्थेत आहेत, कारण ११ जून पर्यंत त्यांना बोर्डाने विद्यार्थ्यांचे गुण अपलोड करण्यास सांगितले आहेत. सीबीएसईने प्रात्यक्षिक परीक्षांचा प्रश्न लेखी परीक्षांच्या निर्णयावेळीच निकाली काढायला हवा होता, असेही शाळांचे म्हणणे आहे. CBSE 12th result 2021: कसा तयार होणार निकाल? सीबीएसईने दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठीदेखील ऑब्जेक्टिव क्रायटेरिया अवलंबला होता. त्याच प्रकारे आता सीबीएसई बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकनदेखील होणार आहे. म्हणजेच विद्यार्थ्याला मिळणाऱ्या गुणांमध्ये त्याच्या शाळेतील कामगिरीची मोठी भूमिका असेल. शाळेत संपूर्ण वर्षात झालेले अंतर्गत मूल्यांकन बारावीचा निकाल तयार करताना महत्त्वाचे मानले जाणार आहे. हे अंतर्गत गुण शाळा देणार आहेत. त्यामुळे शाळांकडून कोणा विद्यार्थ्याला त्याच्या योग्यतेपेक्षा अधिक गुण दिले जाऊ नयेत म्हणून रेफरन्स इयर पॉलिसी (CBSE Reference Year Policy) लागू केली जाणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vTHfSu
via nmkadda