Advertisement
२०२१-२२ या शैक्षणिक वर्षाच्या आरटीई प्रवेशांना मुदतवाढ देण्यात आली आहे. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी ज्या बालकांची प्रवेशासाठी निवड झाली आहे, त्यांच्या पालकांनी शाळेत जाऊन आपल्या पाल्यांचे प्रवेश निश्चित करण्याचा कालावधी ३१ जुलै २०२१ पर्यंत वाढवण्यात आला आहे. ही मुदत २३ जुलै २०२१ रोजी संपत होती. बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार, म्हणजेच शिक्षण हक्क कायद्यानुसार, २५ टक्के जागांवरील प्रवेश निश्चितीसाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने झाली होती. अजूनही ज्या पालकांनी शाळांमध्ये जाऊन प्रवेश निश्चित केलेला नाही, किंवा ज्या पालकांना अजूनही या प्रवेशांची लॉटरी लागल्याचे कळले नाही, त्यांना एसएमएस करून शाळेत प्रवेश घेण्याबाबत कळवावे, असे निर्देश गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ सुरू होऊन एक महिन्याहून अधिक कालावधी उलटला आहे. तरीदेखील गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षीही आरटीई प्रवेशाच्या प्रक्रियेला विलंब झालेला आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे यापूर्वीच प्रक्रिया प्रभावित झालेली आहे. प्रवेशासाठी सोडत जाहीर झाल्यानंतर प्रारंभी प्रवेशासाठी ३० जूनपर्यंत मुदत दिलेली होती. ही मुदत टप्प्याटप्प्याने वाढविण्यात आली होती. आता पुन्हा एकवार मुदतवाढ देण्यात आली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rC9rYT
via nmkadda