Advertisement

परीक्षाच देता न आलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांना निकालाच्या बाबतीत मात्र मोठी लॉटरी लागली आहे, असे म्हणावे लागेत इतके भरघोस गुण मिळाले आहेत. विद्यार्थी, पालकवर्ग यामुळे यंदाच्या निकालावर खूश आहे. मात्र अकरावी प्रवेशासाठी यामुळे मोठीच अडचण होण्याची शक्यता आहे. 'मनासारखे कॉलेज' हे विद्यार्थ्यांसाठी स्वप्न राहू शकेल, इतकी स्पर्धा या निकालामुळे निर्माण होणार आहे. दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल २०२१ ते २० मे २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. मात्र करोना महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा रद्द करण्यात आली. मंडळाच्या इतिहासात प्रथमच अशा पद्धतीने दहावीची संपूर्ण परीक्षाच रद्द करण्यात आली. विद्यार्थ्यांचे नववीच्या वार्षिक परीक्षेच्या गुणांचे वेटेज आणि दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण या आधारे निकाल तयार करण्यात आला. दहावीच्या निकालानुसार, राज्यात ९५७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. मुंबईतल्या नामांकित महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेशांची चुरस सर्वाधिक असते. या १०० टक्के वाल्या ९५७ विद्यार्थ्यांपैकी मुंबईतल्या ३२ विद्यार्थ्यांना १०० टक्के मिळाले आहेत. या पटीने विचार केला तर ९० पेक्षा अधिक टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या देखील भरघोस आहे. राज्यभरात एकूण १ लाख ४ हजार ६३३ विद्यार्थ्यांना ९० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण आहेत. ८५ ते ९० टक्क्यांमध्ये गुण मिळवणारे विद्यार्थी १ लाख २८ हजार १७४ आहेत. यापैकी काही हजार विद्यार्थी मुंबई विभागातले आहेत, परिणामी अकरावी प्रवेशांची यंदा काय स्थिती असेल, हे स्पष्ट होत आहे. सीईटीचा दिलासा सर्वांनाच भरघोस मार्क, मग प्रवेश कसे द्यायचे यावर राज्य सरकारने यंदापुरता ऐच्छिक सीईटीचा मार्ग समोर ठेवला आहे. पण आता हीच सीईटी किमान शहरी भागातल्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशांसाठी तरून नेणार, असे चित्र आहे. श्रेणीनिहाय निकाल श्रेणी - विद्यार्थी संख्या विशेष प्राविण्य (डिस्टिंक्शन) - ६,४८,६८३ प्रथम श्रेणी - ६,९८,८८५ द्वितीय श्रेणी - २,१८,०७० उत्तीर्ण श्रेणी - ९,३५६
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3enQZxC
via nmkadda