Advertisement
CBSE Exams 2022: करोना प्रादुर्भावाचा देशावर विपरीत परिणाम झाला आहे. त्याचा विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. करोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क आणि नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय सीबीएसईने घेतला आहे. या संदर्भात सीबीएसईने अधिकृत वेबसाइटवर एक नोटिफिकेशन जाहीर केले आहे. करोना प्रादुर्भावात आपले पालक किंवा दत्तक पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क किंवा नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही असा निर्णय सीबीएसईने घेतला आहे. अधिकृत नोटिफिकेशननुसार, बोर्डाशी संलग्न शाळांना अशा विद्यार्थ्यांचा तपशील देण्यास सांगितले आहे. अशा विद्यार्थ्यांची सत्यता पडताळून एलओसी सादर करण्याचे निर्देश शाळांना देण्यात आले आहेत. दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी २०२१-२२ साठी शाळांना एलओसीसाठी ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत तपशील सादर करायचा आहे. त्यानंतर विलंब शुल्कासहित ९ ऑक्टोबर २०२१ पर्यंत माहिती द्यावी लागणार आहे. दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा २०२२ अंतर्गत टर्म १ परीक्षा नोव्हेंबर २०२१ मध्ये घेण्यात येणार आहे. टर्म १ परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे. दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक (टर्म १) १० ऑक्टोबरपर्यंत जाहीर केले जाणार आहे. वर्ष २०२२ साठी सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा दोन टप्प्यांत घेण्यात येणार आहेत. टर्म १ परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आणि टर्म २ ची परीक्षा मार्च-एप्रिलमध्ये होणार आहे. सत्र २०२१-२२ साठी दोन सत्रांमध्ये दहावी आणि बारावी परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय सीबीएसईने घेतला होता. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही टर्मच्या परीक्षांना ५० टक्के अभ्यासक्रम असणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kvwoLv
via nmkadda