Advertisement
औरंगाबाद: एमबीए अभ्यासक्रम सीईटी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रात दिलेल्या वेळेत परीक्षा देता आली नाही. सीईटी सेलकडून ऐनवेळी परीक्षेची तारीख, केंद्र बदलाची माहिती देण्यात न आल्याने आमची परीक्षा हुकल्याचा आरोप विद्यार्थी, पालकांनी केला आहे. विद्यार्थ्यांनी डाऊनलोड केलेल्या प्रवेशपत्रावरील वेळापत्रकात १८ सप्टेंबर रोजी शनिवारी सकाळी आठ वाजता ही परीक्षा होणार होती. त्याप्रमाणे विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहचले पण परीक्षा १६ सप्टेंबर रोजीच झाल्याचे त्यांना लॉगिन केल्यानंतर कळले. दरम्यान वेळ, परीक्षा केंद्रामध्ये बदल करण्यात आल्याची कल्पना विद्यार्थ्यांना सीईटी सेलकडून देण्यात आली नाही. कॉलेजलाही या बदलाची कल्पना नसल्याने कॉलेजने बैठक व्यवस्थाही केली होती. विद्यार्थ्यांनी याबाबत सीईटी सेलला निवेदन लिहिले असून सविस्तर घटनाक्रम सांगितला आहे. ९ सप्टेंबरला टेक्स्ट मॅसेजद्वारे आलेल्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र डाउनलोड केले. त्यानुसार विद्यार्थी १८ सप्टेंबर रोजी परीक्षा केंद्रावर पोहचले. पण शेड्युल काऊंटमध्ये नंबर न आल्याने लॉगिन होत नाही असे त्यांना परीक्षाकेंद्रावर सांगण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सीईटी पोर्टलला प्रवेशपत्र तपासले. त्यावेळी परीक्षा दोन दिवस आधीच होऊन गेल्याचे विद्यार्थ्यांना कळाले. आम्हाला याबाबत सीईटी सेलकडून कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती. त्यांचा कोणताही मॅसेज आलेला नाही. तरी आमचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये अशी विनंती विद्यार्थ्यांनी केली आहे. यासंदर्भात प्रतिक शेटे, पियुष वर्मा, प्रभाकर जाधव, प्रकाश भानेगावकर, शेख अझहर चांदपाशा, हरिओम दामेकर, कानबाराव म्हस्के, कृष्णा ढंगारे या विद्यार्थ्यांनी सीईटी सेलला अर्ज केला आहे. सीईटी सेलच्या चुकीमुळे आम्हाला परीक्षेला बसता आले नाही. ९ तारखेला त्यांचा मेसेज आला. त्यानुसार हॉलतिकीट डाउनलोड करून परीक्षेला पोहचलो पण पेपर आधीच झाल्याचे आम्हाला लॉगिन केल्यानंतर कळले. बदल झाल्याचे काही कळवण्याची तसदीही सीईटी सेलने घेतली नाही असे परीक्षार्थी विद्यार्थी कृष्णा ढंगारे याने सांगितले. सीईटी सेलने दिलेल्या वेळापत्रकनुसार आम्ही परीक्षा केंद्रावर पोहचलो. पण दोन दिवसांपूर्वी तुमची परीक्षा होऊन गेली असे त्यांनी सांगितले. वेळापत्रक, परीक्षाकेंद्राबद्दल आम्हाला सीईटी सेलने त्याचवेळी कळवायला हवे होते. पण याबद्दल कॉलेजलाही कळवण्यात आलेले नव्हते. आमचे शैक्षणिक नुकसानाची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न पियुष वर्मा या परीक्षार्थी विद्यार्थ्याने उपस्थित केलाय.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2XAycKt
via nmkadda