Advertisement
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद : सार्वजनिक आरोग्य विभागातील पदासाठी शनिवार व रविवार रोजी होणारी परीक्षा अचानकपणे पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यभरात नऊ लाखांपेक्षा अधिक उमेदवारांनी परीक्षेला नोंदणी केली असून बहुतांशी उमेदवार, पालक परीक्षा केंद्र असलेल्या शहरांमध्ये पोहचले आहेत. ऐनवेळ शासनाच्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला असून वेळ आणि पैसा खर्ची गेला आहे. आरोग्य विभागातील विविध पदासाठी परीक्षेतील गोंधळाची परंपरा या परीक्षेतही कायम आहे. क व ड प्रवर्गातील परीक्षा शनिवार व रविवार असे दोन दिवस राज्यभरात विविध केंद्राहून घेण्यात येणार होती. परीक्षेतील प्रवेशपत्रातील गोंधळ दोन दिवसांपूर्वीच समोर आला होता. राज्यात अनेक विद्यार्थ्यांच्या हॉलतिकीटांमध्ये चूका, परीक्षा केंद्राचा पत्ता नसणे, चुकीचे फोटो, दूर-दूर जिल्ह्यांमध्ये परीक्षा केंद्र अशा गोंधळामुळे उमेदवारांमध्ये गोंधळ, संभ्रमाचे वातावरण होते. त्यातच शुक्रवारी सायंकाळी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हा गोंधळ आणखी वाढला. राज्यात नऊ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेला नोंदणी केलेली आहे. औरंगाबादच्या अनेक उमेदवारांचा नंबर इतर जिल्ह्यांमध्ये आलेला आहे. गोंदिया, भंडारा अशा जिल्ह्यांमध्ये विद्यार्थी परीक्षेला गेलेले आहेत तर तेथील विद्यार्थी पुणे, मुंबई अशा शहरांमध्ये आहेत. तालुका स्तरावरही परीक्षाचे केंद्र देण्यात आले आहेत. परीक्षा सकाळच्या सत्रात असल्याने बहुतांशी उमेदवार शुक्रवारीच परीक्षा असलेल्या शहरांमध्ये पोहचले आहेत. तासनतास प्रवास करून पोहचलेल्या उमेदवारांना परीक्षेच्या काहीतास आधी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे कळल्याने त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे. परीक्षार्थींमध्ये मुली, महिलांचे प्रमाणही अधिक आहे. काहीजन पालकांसह परीक्षा केंद असलेल्या शहरात पोहचले आहेत. आरोग्य विभागाच्या या परीक्षेसाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी अर्ज भरले. उमेदवारांची संख्या वाढल्याने २५ व २६ सप्टेंबर असे दोन दिवस विविध सत्रात परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले. सुरुवातीला परीक्षा केंद्रांचे नियोजन, त्यानंतर तालुका स्तरावर केंद्र देण्यात आले. हॉलतिकीट आले तर त्यामध्येही अनेक चुकांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप होता. त्यात आता अचानक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने अधिक गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत उमेदवारांना कोणाला विचारावे असा प्रश्न पडला होता. केवळ परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे, असा एक मॅसेज विद्यार्थ्यांना मोबाइलवर पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CKbRJu
via nmkadda