Advertisement
म. टा. वृत्तसेवा, ठाणे ग्रामीण भागात गेल्या दीड वर्षांपासून शाळेला असलेले टाळे आता निघत आहे. करोनामुक्त ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यामुळे ठाणे जिल्ह्यातील ३९२ करोनामुक्त गावांमधील ८८ शाळा सुरू झाल्या आहेत. यामध्ये शहापूर तालुक्यातील सर्वाधिक शाळांचा समावेश असून शहापूरमधील तब्बल ५३ शाळा सुरू झाल्या आहेत. करोनामुळे सर्वाधिक नुकसान शैक्षणिक क्षेत्राचे झाले आहे. करोना काळात शाळा बंद असल्यामुळे ऑनलाइन वर्गाचा पर्याय निवडण्यात आला. मात्र, ग्रामीण परिसरातील विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती, स्मार्ट मोबाइल फोनचा अभाव, नेटवर्क अशा अनेक अडचणींमुळे ग्रामीण परिसरातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत होते. यासाठी काही शिक्षक वाड्या-वस्त्यांमध्ये आठवड्यातून एकदा जाऊन वर्ग घेत होते, पण त्यालाही मर्यादा होत्याच. अखेर करोनामुक्त गावांत आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश राज्य शासनाने शिक्षण विभागास दिले होते. त्यानुसार, जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली. अनेक गावांनी शिक्षण विभागाला ठराव करून शाळा सुरू करण्याबाबतचे प्रस्तावही पाठविले. त्यानुसार जिल्ह्यात सद्यस्थितीत खासगी तसेच जिल्हा परिषदेच्या एकूण ८८ शाळा सुरू झाल्याची माहिती जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आली. जिल्ह्यातील ग्रामीण भागात खासगी आणि जिल्हा परिषद अशा सर्व व्यवस्थापनांच्या आठवी ते बारावीच्या एकूण ३८५ शाळा आहेत. पहिल्या टप्प्यात, म्हणजेच १९ जुलैपासून १४ शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. तर दुसऱ्या टप्प्यात ऑगस्ट महिन्यात २२ शाळा सुरू करण्यात आल्या. तिसऱ्या टप्प्यात सप्टेंबर महिन्यात ५२ शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात सद्यस्थितीत ८८ शाळा सुरू झाल्या आहेत. यात शहापूर तालुक्यातील सर्वाधिक म्हणजेच ५३ शाळांचा समावेश आहे. दरम्यान, तिसऱ्या लाटेची शक्यता आणि ग्रामीण परिसरातील शाळा सुरू करण्याचे मोठे आव्हान शाळा पेलत आहेत. शाळा सुरू होण्यासाठी शिक्षकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. यासाठी शिक्षकांच्या लसीकरणास विशेष प्राधान्य दिले जात आहे. ००० ठाणे जिल्ह्यातील ३९२ ग्रामपंचायती करोनामुक्त आहे. त्यामुळे या परिसरात टप्प्याटप्प्याने शाळा सुरू केल्या जात आहेत. ग्रामपंचायतींचा ठराव, पालकांची संमती घेऊन प्रस्ताव शिक्षण विभागाकडे आल्यानंतर शाळा सुरू केल्या जात आहेत. सद्य स्थितीला ग्रामीण भागामधील ८८ शाळा सुरू झाल्या आहेत. - शेषराव बडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी, ठाणे जिल्हा परिषद तालुकानिहाय सुरू झालेल्या शाळा तालुका शाळा मुरबाड ११ कल्याण ०३ शहापूर ५३ भिवंडी ११ अंबरनाथ १० एकूण ८८
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3AlGBzr
via nmkadda