Advertisement
म. टा. प्रतिनिधी, पुणे राज्याच्या सीईटी सेल तर्फे घेण्यात आलेल्या विविध अभ्यासक्रमांसाठीच्या बाराहून अधिक संयुक्त सामाइक परीक्षांचा (सीईटी) निकाल रखडला आहे. हा निकाल रखडल्याने शैक्षणिक वर्षांची सुरुवात करण्यासाठी विलंब होत असून निकाल तातडीने जाहीर करण्याची मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून केली जात आहे. सीईटी सेलकडून आतापर्यंत केवळ तीन 'सीईटीं'चे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये मास्टर ऑफ आर्किटेक्चर, मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि मास्टर ऑफ कम्प्युटर अॅप्लिकेशन या तीन पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सीईटीचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. अभियांत्रिकी, कृषी, औषधनिर्माण; तसेच व्यवस्थापन, बीपीएड, एलएलबी, हॉटेल मॅनेजमेंटचा पदवी अभ्यासक्रम अशा विषयांसाठीच्या सीईटीचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. हे निकाल लवकरात लवकर जाहीर करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. दरम्यान, २८ ऑक्टोबरपर्यंत हे निकाल जाहीर केले जातील, असे स्पष्टीकरण सीईटी सेलकडून देण्यात आले आहे. २८ ऑक्टोबरला सीईटीचे निकाल जाहीर झाले; तर त्यानंतर दिवाळी असल्याने दिवाळीनंतरच प्रवेश सुरू होणार आहेत. यामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू व्हायला नोव्हेंबर महिन्याचा दुसरा आठवडा उजाडणार आहे. राज्य सरकारने कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेतला असून दीड वर्षांनंतर विद्यार्थ्यांना ऑफलाइन शिक्षण घेता येणार आहे. परंतु, अशा परिस्थितीत जर विद्यार्थ्यांचे निकाल लावण्यास विलंब केला; तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने गांभीर्याने विचार करून तातडीने निकालाची प्रक्रिया पूर्ण करावी, या मागणीने आता जोर धरला आहे. तातडीने निकाल लावून प्रवेश प्रक्रिया सुरू करावी सीईटीचा निकाल लागल्यानंतर प्रवेशांच्या प्रक्रिया सुरू होतील. त्यात काही दिवस जातील. लवकरात लवकर निकाल लागला तर प्रत्यक्ष शिक्षणाला सुरुवात करता येतील. कॉलेज सुरू झाली आहेत, ही चांगली बाब असून आम्ही कॉलेजमध्ये जाऊन शिकण्यास उत्सुक आहोत. सरकारने तातडीने निकाल लावून प्रवेश प्रक्रिया सुरू करावी, अशी अपेक्षा आहे. - पार्थ पवार, विद्यार्थी
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jbZ3Eo
via nmkadda