Advertisement
मुंबई : राज्यातील आश्रमशाळेत शिकणाऱ्या आठ विद्यार्थ्यांनी जेईई अॅडव्हान्समध्ये यश मिळवून आयआयटीमध्ये प्रवेश निश्चित केला आहे. तर उर्वरित विद्यार्थी 'नीट'च्या आणि 'एमएचसीईटी'च्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांनी नीट, जेईईसारख्या परीक्षा देऊन नामांकित शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घ्यावे या उद्देशाने केंद्र सरकारच्या आदिवासी कल्याण मंत्रालयाने राज्यांना विशेष योजनेंतर्गत निधी उपलब्ध करून दिला. या अंतर्गत राज्यातील आदिवासी विकास मंत्रालयामार्फत आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करून घेण्यासाठी सन २०१९मध्ये 'सुपर ५०' नावाने विशेष उपक्रम हाती घेण्यात आला. या उपक्रमात निवड झालेल्या आठ विद्यार्थ्यांनी जेईई अॅडव्हान्समध्ये यश मिळवले आहे. त्यातील तीन विद्यार्थी थेट प्रवेशास पात्र ठरले आहेत. तर पाच विद्यार्थी पूर्वतयारी अभ्यासक्रमासाठी पात्र ठरले आहेत. एक वर्षाच्या अभ्यासक्रमात यश मिळाल्यानंतर त्यांना आयआयटीमध्ये पुढील शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. राज्याच्या आदिवासी विभागाने विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी 'क्वेस्ट' नावाने एक चिंतन गट तयार केला आहे. याद्वारे आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांसाठी आयआयटीन स्पेस या संस्थेच्या माध्यमातून विशेष उपक्रम हाती घेतला होता. या उपक्रमाअंतर्गत आश्रमशाळा, निवासी शाळा, एकलव्य शाळांमधून सन २०१९मध्ये इयत्ता दहावीला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा झाली. सुमारे १५ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याची माहिती क्वेस्टच्या सल्लागार नम्रता शहा यांनी दिली. यातून इंजिनीअरिंग-मेडिकलकडे कल असलेल्या विद्यार्थ्यांची नावे निश्चित झाली आणि ९०० विद्यार्थ्यांची आणखी एक चाचणी घेण्यात आली. यातून अंतिम ५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये २५ मुलींचा समावेश होता, असे शहा यांनी सांगितले. या उपक्रमात विभागचे सचिव अनुप कुमार आणि तत्कालीन सचिव यांचे सहकार्य मिळाले. पालक, विद्यार्थ्यांचे समुपदेशन करून त्यांना 'पेस'च्या वागड येथील निवासी कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याबाबत सांगण्यात आले. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क, हॉस्टेल शुल्क आणि प्रवेश परीक्षा शुल्क याची जबाबदारी सरकारने घेतली होती. गुणवंत...यशवंत २४ विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली. तर २६ विद्यार्थ्यांनी जेईईची परीक्षा दिली. यातील २४ जण उत्तीर्ण झाले. थक्सेन करोट, ओंकार मुंढे, सुरज कोकानी या तिघांनी अॅडव्हान्समध्ये अनुक्रमे ४४८, ६९५, ९४९ गुण मिळवून आयआयटीमध्ये प्रवेश निश्चित केला. तर प्रतीक कोल्हे, भूषण पावरा, सविता कोल्हा, अभिषेक गावित, दर्शना दौडा पूर्वतयारी वर्गासाठी पात्र ठरले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Z5xxl8
via nmkadda