Advertisement
म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई : एका दशकात एक लाख ४६ हजार शिक्षकांना इंग्रजीचे शिक्षण मिळाल्यानंतर आता राज्यातील शिक्षकांचा गणित आणि विज्ञानाचा पाया पक्का करण्याकडे सरकारचा कल आहे. यासाठी ब्रिटिश कौन्सिलसोबत लवकरच विशेष उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. राज्यातील सरकारी शाळांमधील शिक्षकांना उत्तम इंग्रजी बोलता यावे, शिकवता यावे या उद्देशाने राज्य सरकारने २०१२मध्ये ब्रिटिश कौन्सिलसोबत एक विशेष उपक्रम हाती घेतला होता. यामध्ये शिक्षकांना इंग्रजीचे शास्त्रशुद्ध शिक्षण दिले जात होते. शिक्षकांनी ते शिक्षण स्थानिक पातळीवरील शिक्षकांना देऊन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे असे या उपक्रमाचे उद्दिष्ट होते. याअंतर्गत गेल्या १० वर्षांत सुमारे दोन हजार 'मास्टर ट्रेनर' तयार झाले असून, एक लाख ४६ हजार शिक्षकांना या प्रशिक्षणाचा लाभ मिळाला आहे. तर याचा फायदा ४३ लाख ८० हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे. या उपक्रमाच्या यशानंतर आता गणित आणि विज्ञानाचे शिक्षणही विद्यार्थ्यांना अधिक चांगल्याप्रकारे मिळावे या उद्देशाने येत्या काळात ब्रिटिश कौन्सिलशी हातमिळवणी करण्यात येणार आहे. मुंबईत गुरुवारी एका कार्यक्रमात याबाबत माहिती देण्यात आली. राज्यातील सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या लक्षावधी विद्यार्थ्यांच्या अध्ययन व शिक्षणाच्या दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे व या उद्देशाच्या दिशेने ब्रिटिश कौन्सिलने सादर केलेला परिणाम अहवाल बघताना आनंद होत असल्याचे शालेय शिक्षणमत्री यांनी यावेळी सांगितले. राज्यातील अभ्यासक्रम अधिक सक्षम व्हावा या उद्देशाने आयबी, केंब्रिजसारख्या अभ्यास मंडळांशी चर्चा करून आपल्या पाठ्यक्रमात काय बदल करता येतील, या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत असल्याचे राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी सांगितले, तर आमच्या विविध प्रकल्पांद्वारे शालेय शिक्षण प्रणालीला सहाय्य करण्यासाठी व सकारात्मक परिणाम घडवण्यासाठी दीर्घकालीन सुधारणा करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे ब्रिटिश कौन्सिलचे पश्चिम भारत संचालक डॉ. जोवन लिसे यांनी सांगितले. शिक्षकांच्या शाश्वत विकासाद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण व रोजगाराच्या सातत्याने स्पर्धात्मक होणाऱ्या जगामध्ये यशस्वी होण्यासाठी या प्रणालीद्वारे मदत दिली जात आहे. ब्रिटिश कौन्सिलच्या प्राथमिक शाळांसाठी इंग्रजी भाषा उपक्रम (ईलिप्स), माध्यमिक शाळांसाठी इंग्रजी भाषा उपक्रम (ईएलआयएसएस) आणि इंग्लिश फॉर ऑल मुंबई (ईएफए) अशा उपक्रमांमुळे शिक्षकांच्या योग्यतेमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. त्यामुळे दरवर्षी विद्यार्थ्यांनाही उच्च गुणवत्तेचे शिक्षण मिळत आहे. - वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमत्री
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3b9VRo2
via nmkadda