Advertisement
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिक्षणाच्या मुद्द्यांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असली तरीही आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासंदर्भात जाणीवजागृती नसल्याची खंत या भागातील पालक, विद्यार्थी तसेच सामाजिक संस्थाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेताना आश्रमशाळा आणि निवासीशाळांचा विचार का केला नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. राज्याच्या आदिवासी भागामध्ये अनेक ठिकाणी मोबाइलची रेंज पोहोचत नाही. जिथे खायला दोन वेळचे पोटभर मिळत नाही, तिथे मोबाइलची चैन कशी परवडणार, हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क नाही का, असा प्रश्न खोज या संस्थेच्या बंडू साने यांनी उपस्थित केला. आश्रमशाळांमध्ये पाठवण्यासाठी पालकांची मानसिकता तयार करण्याची गरज आदिवासी समाजाच्या प्रश्नावर सातत्याने काम करणाऱ्या प्रतिभा शिंदे यांनी व्यक्त केली. मेळघाटसह महाराष्ट्रात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी अनुदानित स्वयंसेवी संस्था संचालित शासकीय व अशासकीय आश्रमशाळांची संख्या ५५६ इतकी आहे. तर, आदिवासी विकास विभागाच्या सरकारमान्य ५४६ आश्रमशाळा आहेत. या आश्रमशाळांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २०१८-१९च्या एका अहवालानुसार एकूण २,४८,७७९ एवढी असल्याचे साने यांनी सांगितले. या सगळ्या आश्रमशाळा फेब्रुवारी २०१९पासून बंद आहेत. सरकारने ४ ऑक्टोबर रोजी शाळा सुरू करण्याचा निर्णय़ घेताना आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा विचार का केला नाही, असा प्रश्न चंद्रपूरमध्ये शिक्षणाच्या मुद्द्यांवर काम करणाऱ्या चंद्रशेखर पवार यांनी उपस्थित केला. स्थलांतर सुरू झाल्यानंतर काय? दिवाळीनंतर मेळघाटसह संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी समाज रोजगाराच्या शोधात गावाबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मूठभर शेतीवर गुजराण कशी करणार या विचारात आदिवासी समाज स्थलांतर करून पुढील महिन्यांची तरतूद करतो. हे स्थलांतर सुरू झाले तर आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न पुन्हा बिकट होण्याची शक्यता गडचिरोली येथील गुंजन तायडे यांनी व्यक्त केली. अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी झगडणाऱ्या या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी असलेला झगडा अधिक कडवा असतो. मुख्य प्रवाहातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा विचार करताना आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांचाही विचार व्हावा याकडे त्यांनी लक्ष वेधले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3DWXdPI
via nmkadda