Advertisement
- युनेस्कोने देशाच्या शिक्षणाबद्दल जो अहवाल प्रकाशित केला, त्यामध्ये शिक्षक पुरेसे नाहीत, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. मात्र राज्यात मोठ्या संख्येने अतिरिक्त शिक्षक आहेत. हा विरोधाभास नाही का? - शिक्षण हक्क कायद्यानुसार शिक्षक विद्यार्थी यांचे जे गुणोत्तर दिले आहे, तशी सर्वच शाळांमध्ये परिस्थिती नाही. यामुळे ही मोठी विषमता आहे. एकीकडे शिक्षक अतिरिक्त दिसत असले तरी देशात एक लाखांहून अधिक शाळा आजही एकशिक्षकी आगलहेत. म्हणजे या शिक्षकांचे योग्य ते नियोजन होणे आवश्यक आहे. - या अहवालात शिक्षक पेशाचे सामाजिक महत्त्व वाढविण्याची गरज असल्याचे नमूद केले आहे. याबद्दल आपण नेमके काय सांगाल? - आज आपल्या देशात प्रत्येक पालक आपल्या पाल्याला इंजिनीअर, डॉक्टर बनविण्याचे स्वप्न पाहतो; मात्र शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणारे पालक कमी आहेत. ग्रामीण भागात ही संख्या जास्त असल्याचे जाणवते. मात्र शहरी भागात शिक्षक होणारे तरुण फारच कमी आहेत. याउलट परिस्थिती चीन, रशियामध्ये पाहावयास मिळते. यामध्ये विविध कारणांचा समोवश असून, खासगी शाळांमध्ये शिक्षकांना मिळणारे वेतन हे महत्त्वाचे कारण म्हणता येईल. - शिक्षकांकडे अशैक्षणिक कामे दिली जातात, याबाबत तुम्ही चिंता व्यक्त केली आहे... - आज अनेक शाळांमध्ये लिपिकांची पदे रिक्त आहेत. अशा परिस्थितीत शिक्षकांनांच लिपिकांची कामे करावी लागत आहेत. याचबरोबर विविध सरकारी योजनांचे काम करण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती केली जाते. करोनाकाळातही शिक्षकांना विविध कामे देण्यात आली. शिक्षकांचा जास्तीत जास्त वेळ हा अध्यापन आणि अध्यापन विकासासाठी जाणे विद्यार्थी हिताचे आहे. यात जनगणनेसारख्या कामांमुळे शिक्षकांना त्यांच्या आसपासच्या परिसराची ओळख होते. यामुळे ही कामे वगळता इतर कामांसाठी शिक्षकांची नियुक्ती करू नये. - करोनाकाळात डिजिटल विषमता मोठ्या प्रमाणावर समोर आली आहे. याबाबत उपाय काय सांगता येईल? - करोनाकाळात ऑनलाइन शिक्षणामुळे देशातील डिजिटल शिक्षणाच्या अनेक मर्यादा समोर आल्या. भविष्यात प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या तरी मिश्र शिक्षणपद्धती रुढ होणार आहे. यामुळे शिक्षण हक्क कायद्यात विद्यार्थ्यांना कोणते हक्क मिळाले पाहिजेत याचा उल्लेख आहे. त्यामध्ये तंत्रज्ञानाचा म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला इंटरनेटजोडणी असलेले एक डिजिटल उपकरण असावे याचा समावेश व्हावा. तसे झाले तरच ही डिजिटल विषमता काही प्रमाणात दूर होऊ शकेल. - शिक्षक प्रशिक्षणावर तुम्ही विशेष भर दिला आहे. सध्याची प्रशिक्षण पद्धत योग्य आहे का? - करोनाकाळात शिक्षक प्रशिक्षणाला नवा आयाम मिळाला. शिक्षकांना तंत्रज्ञान सक्षम करण्यापासून नानाविध प्रशिक्षण देणे काळाची गरज बनली आहे. या कालावधीत अनेक शिक्षकांनी स्वत:हून आपला विकास केला. मात्र त्यामध्ये एक सुसूत्रता आणणेही महत्त्वाचे आहे. यासाठी शिक्षक प्रशिक्षण केवळ तंत्रज्ञान दृष्टीने नव्हे, तर बदलत्या शिक्षणपद्धतीबद्दल असणेही आवश्यक आहे. - तुम्ही या अहवालात दहा सूचना केल्या आहेत. त्यातील तातडीने पूर्ण व्हावी, अशी कोणती सूचना आहे? - शिक्षकांना पहिल्या फळीचे कर्मचारी म्हणून दर्जा देणे ही सूचना सर्वांत महत्त्वाची आहे. सध्याच्या काळात ही बाब होणे हे शिक्षक आणि विद्यार्थी दोन्हींच्या हिताचे आहे. (मुलाखत : नीरज पंडित)
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3BOgMc6
via nmkadda