Advertisement
Veergatha Project: देशातील वीरांच्या जीवन आणि बलिदानाच्या कथांमधून विद्यार्थ्यांमध्ये शौर्याची भावना जागृत करण्यासाठी शिक्षण मंत्रालयातर्फे पुढाकार घेण्यात आला आहे. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या प्रस्तावानुसार शिक्षण विभागातर्फे २१ ऑक्टोबरपासून विद्यार्थ्यांना 'वीरगाथा प्रोजेक्ट' बनवून पाठवता येणार आहे. यामधील बेस्ट २५ प्रोजेक्ट बनविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनी सन्मानित केले जाणार आहे. मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'वीरगाथा प्रोजेक्टचे आयोजन शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागातर्फे करण्यात आले आहे. हा प्रोजेक्ट २१ ऑक्टोबरला सुरु होणार असून २० नोव्हेंबर २०२१ पर्यंत सुरु राहील. यामध्ये तिसरी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. या प्रोजेक्टमध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी (सीबीएसई) संलग्न शाळांव्यतिरिक्त, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या शाळांमधील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.' वीरगाथा प्रोजेक्टच्या प्रस्तावानुसार, त्यात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना शौर्यासाठी पदके आणि सन्मान मिळालेल्या वीरांच्या जीवन आणि त्यागावर एक प्रोजेक्ट तयार करावा लागेल. हा प्रोजेक्ट कविता, लेख, चित्रे, व्हिडिओसह मल्टी मीडिया सादरीकरणाच्या स्वरूपात असू शकतो. यातून २५ प्रोजेक्ट निवडले जातील आणि त्यांना संरक्षण मंत्रालयाकडून प्रत्येकी १० हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल. त्याच्या विजेत्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीला आमंत्रित देखील केले जाईल. या संदर्भात सीबीएसईच्या एका अधिकाऱ्यांनी माहिती दिली. त्यानुसार सीबीएसईशी संलग्न शाळांसाठी वीर गाथायोजना सीबीएसईच्या आयटी प्लॅटफॉर्मवर सुरु केली जाऊ शकते. राज्यातील शाळांमध्ये यासाठी MyGov प्लॅटफॉर्म सुरु केला जाणार आहे. सीबीएसईच्या वीरगाथा पोर्टल आणि MyGov प्लॅटफॉर्मवरील मिळालेल्या माहितीवरुन यामध्ये २५ विजेत्यांची निवड केली जाणार आहे. शालेय स्तरावर ही प्रक्रिया २१ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण केली जाईल. स्कूल बोर्डच्या वीर गाथा योजना पोर्टलवर १ नोव्हेंबर २०२१ ते ३० नोव्हेंबरपर्यंत प्रोजेक्ट पाठविता येऊ शकतो. वीरगाथा प्रोजेक्ट अंतर्गत इयत्ता तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी १५० शब्दांची कविता किंवा निबंध लिहावा. किंवा शौर्य पुरस्कार प्राप्त करणाऱ्या व्यक्तीवर चित्र काढावे. इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी ३०० शब्दांमध्ये एक कविता किंवा निबंध लिहावा. किंवा चित्र काढावे. ते व्हिडिओ सादरीकरण देखील करू शकतात. इयत्ता नववी आणि दहावीचे विद्यार्थी शौर्य सन्मान मिळालेल्या जवानांवर ७५० शब्दांपर्यंत कविता किंवा निबंध लिहू शकतात. या वर्गातील विद्यार्थी व्हिडिओ सादरीकरण देखील तयार करू शकतात. त्याचप्रमाणे अकरावी आणि बारावीचे विद्यार्थी १ हजार शब्दांपर्यंत कविता किंवा निबंध लिहून पाठवू शकतात. किंवा पेंटिंग करु शकतात. या वर्गातील विद्यार्थी देखील व्हिडिओ सादरीकरण करुन आपला विषय मांडू शकतात.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3p82NdR
via nmkadda