Advertisement
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी १२ सप्टेंबर रोजी देशभरात घेण्यात आलेल्या 'नीट' (NEET) चाचणीदरम्यान सोलापूरमधील परीक्षा केंद्रात पर्यवेक्षकांनी घातलेल्या गोंधळामुळे दोन विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे परीक्षाच देता आली नाही आणि त्यांचे नाहक नुकसान झाले, असे सुनावणीअंती स्पष्ट झाल्याने त्यांची 'नीट' चाचणी पुन्हा घेण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या अखत्यारीतील नॅशनल टेस्टिंग एजन्सीला (NTA) दिला आहे. वैष्णवी भोपळे (१९) व अभिषेक कापसे (१९) या दोघांनी अॅड. पूजा थोरात यांच्यामार्फत रिट याचिका करून आपली कैफियत मांडली होती. त्याविषयीच्या अंतिम सुनावणीअंती न्या. रमेश धनुका व न्या. अभय अहुजा यांच्या खंडपीठाने या दोघा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा हा आदेश बुधवारी दिला. या दोघांची 'नीट' चाचणी पुन्हा घेऊन दोन आठवड्यांत निकाल जाहीर करावा, असे खंडपीठाने आदेशात स्पष्ट केले. 'याचिकादार विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला बसू देता येणार नाही. तसा निर्णय प्रशासनाला घेता येणार नाही', अशी भूमिका एनटीएतर्फे मांडण्यात आली. मात्र, 'प्रतिवादी प्रशासनांच्या चुकीमुळे या विद्यार्थ्यांचे नुकसान होता कामा नये', असे निरीक्षण नोंदवत आणि हा आदेश इतरांसाठी पायंडा म्हणून गृहित धरला जाऊ नये, असे स्पष्ट करत खंडपीठाने एनटीएला आदेश दिला. वैष्णवी व अभिषेकला सोलापूर जिल्ह्यातील कुंभारी गावातील अक्कलकोड रोडवर असलेले श्री स्वामी नारायण गुरूकूल इंटरनॅशनल स्कूल हे परीक्षा केंद्र मिळाले होते. त्याप्रमाणे ते दोघे १२ सप्टेंबर रोजी 'नीट' चाचणी देण्यासाठी उपस्थित राहिले. 'नीट' अंतर्गत संपूर्ण देशात एकच प्रश्नपत्रिका असते. मात्र, परीक्षेत गैरप्रकार होऊ नये यादृष्टीने प्रश्नांचा क्रम वेगळा ठेवला जातो आणि त्यादृष्टीने प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका एकाच संकेतांकाची व एकाच लिफाफ्यात ठेवली जाते. याविषयी दर्शनी पानावर स्पष्ट सूचनाही असतात. असे असतानाही या शाळेतील एका वर्गात १२ विद्यार्थ्यांच्या असलेल्या दोन गटांपैकी एका गटाला पर्यवेक्षकांनी प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका योग्य पद्धतीने दिले. मात्र, सहा विद्यार्थ्यांच्या अन्य गटाला देताना गोंधळ घातला. त्यात वैष्णवी व अभिषेकला एकाच संकेतांकाची प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका मिळाली नाही. ही चूक त्यांनी वारंवार पर्यवेक्षकांना दाखवली असता त्यांनी दोघांना दरडावून गप्प केले. परीक्षेची वेळ संपताच दोघांनी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे तक्रार दिली. त्यानंतर सोलापूर जिल्हाधिकारी व संबंधितांनाही ईमेलद्वारे तक्रार केली. अखेर चूक झाल्याची कबुली शाळेने दिली.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3pu2Bpb
via nmkadda