Advertisement
राज्यातील शाळांच्या दिवाळीच्या सुट्टीसंदर्भातला ( Vacation) अभूतपूर्व गोंधळ सरकारी पातळीवर पाहायला मिळत आहे. राज्यातील शिक्षण निरीक्षकांनी परिपत्रक काढून १ ते २० नोव्हेंबर या कालावधीत शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर केली. त्यानंतर शालेय शिक्षण विभागाने परिपत्रक जारी करून २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर पर्यंत दिवाळीची सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे दिवाळीची सुट्टी नेमकी कधी, असा प्रश्न विद्यार्थी, पालकांना पडला आहे. शिवाय चार दिवस अगोदर सुट्टी मिळतेय याचा आनंद मानायचा की दहा दिवस आधी सुट्टी संपतेय याचं दु:खं करायचं हाही प्रश्न अनेक पालकांना पडला आहे. कारण आधी जाहीर केलेल्या सुट्टीनुसार अनेकांनी रजेचे नियोजन केले असण्याची शक्यता आहे. अनेक शाळांनी शासन परिपत्रकानुसार, आता २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत दिवाळीची सुट्टी जाहीर केली आहे. नेमका काय आहे गोंधळ? माध्यमिक शाळा संहितेनुसार सुट्टी देण्याचे अधिकार शाळांना आहेत. मुंबईतील शिक्षण निरीक्षकांनी दिवाळी सुट्टीबाबत सोमवारी २५ ऑक्टोबर २०२१ रोजी आदेश जारी करत शाळांना १ ते २० नोव्हेंबर या कालावधीत दिवाळीची सुट्टी जाहीर केली. त्यानंतर दोनच दिवसांनी राज्याचे शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव राजेंद्र पवार यांनी परिपत्रक जारी करत शाळांना २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर पर्यंत दिवाळीची सुट्टी जाहीर केली. शिक्षण सहसचिवांनी काढलेले शासन परिपत्रक व शिक्षणमंत्र्यांनी केलेले ट्विट नियमबाह्य असल्याची टीका भाजपा शिक्षक आघाडीने केली आहे. 'शिक्षण निरीक्षकांनी काढलेल्या आदेशानुसार मुंबईतील शाळांना १ ते २० नोव्हेंबर अशी सुट्टी जाहीर करण्यात आली होती त्यानुसार अनेक शाळांनी ३० ऑक्टोबर पर्यंत प्रथम सत्र परीक्षेचे आयोजन केले आहे त्या परीक्षांचे नियोजन कोलमडून पडणार आहे. अनेक पालकांनी व शिक्षकांनी गावी जाण्याचे नियोजन केले असून रेल्वे व बसचे आरक्षण केले आहे. परवा याबाबत मुंबईतील शिक्षण निरीक्षकांनी सुट्टीबाबत आदेश काढले तसे शाळांनी नियोजन करून परीक्षांचे आयोजन व सुट्टीबाबत पालकांना कल्पना दिली मग आज पुन्हा यामध्ये बदल करून गोंधळाची परिस्थिती का निर्माण केली?' असा प्रश्न भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी उपस्थित केला आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Eme7aE
via nmkadda