Advertisement
College Reopening: राज्यातील महाविद्यालये २० ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. दरम्यान दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजला येण्याची परवानगी मिळणार आहेत. तसेच महाविद्यालयातर्फे शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाल्याची चाचपणी केली जात आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या ऑफलाइन वर्गांचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान राज्य व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कॉलेजला येणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच विशेष आवाहन देखील केले आहे. वीस तारखेपासून कॉलेज सुरू होत आहेत. सर्वांनी कॉलेजला येताना शासनाने आणि विद्यापीठांनी घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पणाने पालन करा असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले आहे. आपली सुरक्षितता ही देखील आम्हाला महत्वाची असल्याचे ते म्हणाले. कॉलेज सुरू करण्याचा निर्णय ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला राज्य सरकारने पाचवी ते बारावी पर्यंतचे वर्ग प्रत्यक्ष सुरू केले. यानंतर कॉलेजे प्रत्यक्ष कधी सुरू होणार, यावर चर्चा सुरू झाली. 'मटा'नेही कॉलेज सुरू होणे कसे आवश्यक आहेत आणि ते प्रत्यक्ष कसे शक्य आहे, याबाबतचे वृत्त दिले होते. यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाने याबाबत निर्णय जाहीर करत २० ऑक्टोबरपासून कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये शहरातील इंजिनीअरिंग, पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांचे वर्ग सुरू होणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांच्या दोन्ही लसमात्रा झाल्या आहेत, अशा विद्यार्थ्यांनाच कॉलेजमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. याचबरोबर विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी कॉलेजांनी लसीकरण शिबिरांचे आयोजन करावे, अशा सूचनाही सरकारने दिल्या आहेत. कॉलेज संकुलांचे निर्जंतुकीकरण करण्याबाबतही सांगण्यात आले आहे. या सर्व दृष्टीने कॉलेजांनी तयारीस सुरुवात केली आहे. अनेक कॉलेजांनी आपल्या कॉलेजातील शिक्षक आणि कर्मचारी यांच्या लसीकरणाचा तपशील मागविला आहे. सुमारे ९० टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाल्याचे सूत्रांनी सांगितले. याचबरोबर ५० टक्के क्षमतेने कॉलेज सुरू करावयाचे असल्यामुळे नमके कसे नियोजन करण्यात यावे, याबाबतही कॉलेज प्रशासन आणि प्राचार्य नियोजन करत आहेत. बहुतांश कॉलेजांमध्ये निर्जंतुकीकरण प्रक्रिया यापूर्वी पूर्ण झाली आहे. असे असले, तरी बुधवारच्या आधी आणखी एकदा ही प्रकिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे प्राचार्यांनी सांगितले. मुंबई विद्यापीठाच्या महाविद्यालयांना सूचना कॉलेजांचे वर्ग सुरू करताना मुंबई विद्यापीठातर्फे संलग्न महाविद्यालयांना सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेने सुरू करताना करोनाच्या आजाराचा स्थानिक पातळीवरील प्रादुर्भाव व स्थानिक परिस्थिती, प्रतिबंधित प्रक्षेत्रांचे नियोजन व आरोग्यविषय पायाभूत सुविधांची उपलब्धता या बाबी विचारात घेण्यात याव्यात. तसेच कॉलेजे सुरू करण्यासंदर्भात स्थानिक प्राधिकरणांशी विचारविनिमय करून कॉलेजांनी त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा, आदी सूचना विद्यापीठाने परिपत्रकामध्ये दिल्या आहेत. १८ वर्षांवरील ज्या विद्यार्थ्यांनी लशींचे दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थी किंवा विद्यार्थिनींना कॉलेजात प्रत्यक्ष उपस्थित राहता येईल, अशी सूचना राज्य सरकारने दिली आहे. या सूचनांचे तंतोतंत पालन करत ज्या विद्यार्थ्यांनी करोनाची लस घेतलेली नाही त्यांच्यासाठी कॉलेजांनी स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून लसीकरणासाठी विशेष मोहीम घ्यावी, तसेच कॉलेजातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचेही प्राधान्याने लसीकरण करून घ्यावे, अशा सूचनाही मुंबई विद्यापीठाने कॉलेजांना केल्या आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3aPMutQ
via nmkadda