Advertisement

Reopening 2021: राज्यभरातील ग्रामीण भागात पाचवी ते बारावी तर शहरी भागात आठवी ते बारावीच्या शाळा आजपासून सुरु झाल्या आहेत. शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत केले जात आहे. दीड वर्षाच्या कालावधीनंतर शाळेत प्रत्यक्ष पाऊल ठेवत असल्याने आणि मित्र परिवार पुन्हा भेटल्याने विद्यार्थी देखील उत्साहात आहेत. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. करोना केसेसचे प्रमाण कमी झाल्यानंतर टास्क फोर्सशी चर्चा करुन शिक्षण विभागाने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. करोना प्रतिबंध सर्व नियमांचे पालन करुन शाळा सुरु झाल्या आहेत. दरम्यान वर्षा गायकवाड यांनी ट्विटरद्वारे पालक आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यभरातील शाळा आजपासून पुन्हा एकदा सुरु होत आहेत. यानिमित्ताने विद्यार्थी आणि पालकांना मनापासून शुभेच्छा! आजचा शाळेतील पहिला दिवस आपण सुरक्षित आणि आनंदीत वातावरणात घालवाल, असा मला ठाम विश्वास आहे, असे ट्वीट वर्षा गायकवाड यांनी केले. तसेच सायन येथील डी. एस. स्कुल या शाळेला आज सकाळी वर्षा गायकवाड यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांसोबत गप्पा मारल्या. शाळेच्या व्यवस्थापनाची पाहणी केली. #BackToSchool अंतर्गत शाळेत हजेरी लावलेल्या विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या; पहिल्या दिवसाच्या भावना जाणून घेतल्या. राज्यभरातील शाळांत शारीरिक अंतर राखून वर्ग भरवले जात आहेत, यावर शाळा व्यवस्थापन कमिटी सातत्याने लक्ष ठेऊन असल्याची माहिती त्यांनी दिली. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन, शहरातील अनेक शाळांनी स्वखर्चातून विद्यार्थ्यांना सॅनिटायझर, मास्क मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे स्वच्छतागृहांची साफसफाई करण्यात आली असून, त्यामध्ये साबण आणि पाणी २४ तास उपलब्ध राहील, याची काळजी घेण्यात आली आहे. वर्गखोल्यांच्या देखभाल-दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. एका बाकावर एक जण बसेल, याची काळजी घेण्यात येईल. वर्गात अधिकाधिक हवा खेळती राहील, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. शाळांसाठी महत्वाचे निर्देश शाळा सुरु होताना टास्क फोर्सने दिलेल्या सुचनांचे पालन करणे शाळांसाठी बंधनकारक असणार आहे. प्रत्येक शाळेने शक्य असल्यास हेल्थ क्लिनिक सुरु करावे. नियमितपण विद्यार्थ्यांचे तापमान तपासावे अशी सूचना करण्यात आली आहे. मुलांनी शाळेत पायी येण्यास शिक्षकांनी प्रोत्साहित करावे. ज्या शाळांमध्ये स्कूलबस किंवा खासगी वाहनांनी विद्यार्थी येतात तिथे एका सीटवर एक विद्यार्थी अशी आसन व्यवस्था असावी असे निर्देश देण्यात आले आहेत. जेवण आणि इतर बाबी केल्यानंतर साबण किंवा सॅनिटायझरने हात धुण्याबाबत विद्यार्थ्यांना सतत सूचना द्याव्यात. तसेच सद्यस्थितीत मैदानी खेळ घेऊ नयेत अशा सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. सरसकट शाळा सुरु करण्याची मागणी शहरी भागात केवळ आठवी ते बारावी आणि ग्रामीण भागात पाचवी ते बारावी, असे वर्गीकरण न करता सरसकट पहिलीपासून शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी शिक्षक आणि मुख्याध्यापकांकडून केली जात आहे. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे शाळा सुरू नसल्याने मोठे नुकसान होत असून, या विद्यार्थ्यांनाही शाळेत जाण्याची संधी मिळायला हवी, अशी भूमिका आता शिक्षण क्षेत्रातून मांडण्यात आली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ovOE9K
via nmkadda