Advertisement
म. टा. प्रतिनिधी, पुणे करोनाचा प्रादुर्भाव ओसरत असल्याचे दिसून आल्याने राज्यात पहिली ते चौथीच्या शाळाही सुरू करण्याचे संकेत शिक्षण आयुक्तांनी दिले आहेत. दिवाळीनंतर पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनाही प्रत्यक्ष वर्गात जाऊन शिक्षण घेणे शक्य होईल, असे प्राथमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे. शिक्षक आणि मुख्याध्यापकांनीही सुरू व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. राज्यात ग्रामीण भागात पाचवी ते बारावी आणि शहरी भागामध्ये आठवी ते बारावी अशा इयत्तांचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. लवकरच शहरी भागातही पाचवीपासून शाळा सुरू करण्यात येणार आहेत. याचाच पुढील टप्पा म्हणून आता पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करावेत, अशा मागणीने जोर धरला आहे. करोनाच्या परिस्थितीत होणारी सुधारणा अशीच कायम राहिली, तर दिवाळीनंतर या वर्गांनाही मुहूर्त लागणार आहे. गेल्या दीड वर्षांपासून शाळा सुरू झालेल्या नाहीत. जे विद्यार्थी यंदा पहिलीत शिक्षण घेणार आहे, अशांनी शाळा पाहिलेली देखील नाही. या मुलांना शाळेच्या वातावरणाची सवय लावणे अत्यंत गरजेचे आहे. या वरच्या इयत्तेतील मुलांपेक्षा खरेतर पहिली ते चौथीच्या मुलांच्या शाळा सुरू करण्याची अधिक गरज असल्याचे शिक्षण तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर दिवाळीनंतर पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याबाबत प्राथमिक शिक्षण विभागात बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. हे वर्ग सुरू करताना कोणती काळजी घ्यायची, विद्यार्थ्यांसाठी आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित वातावरण कसे तयार करायचे, यावर चर्चा केली जाणार आहे. शहरात आणि ग्रामीण भागातील सुरू झालेल्या शाळांची आकडेवारी पाहिली, तर अनेक शहरांमधील आठवी ते बारावीच्या जवळपास शंभर टक्के शाळा सुरू झाल्या आहेत. ग्रामीण भागातही ९० ते ९५ टक्के शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. या शाळांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढत चालली असून, पालकांकडून कोणताही विरोध होत नसल्याचे चित्र आहे. हे चित्र सकारात्मक असून, दिवाळीनंतर पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनाही शाळांमध्ये येण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शिक्षक आणि पालकांकडून केली जात आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Z32Xbu
via nmkadda