Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, ३ डिसेंबर, २०२१, डिसेंबर ०३, २०२१ WIB
Last Updated 2021-12-02T19:48:36Z
करिअर वृत्तान्त – LoksattacareerResults

यूपीएससीची तयारी : प्राचीन भारत

Advertisement

यूपीएससी पूर्वपरीक्षा – पेपर पहिला

श्रीकांत जाधव

आजच्या लेखामध्ये आपण भारतीय इतिहास आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळ यामधील प्राचीन भारत या घटकाची पूर्वपरीक्षेसाठी तयारी कशी करावी यावर चर्चा करणार आहोत. या घटकावर २०११ ते २०२१ मध्ये एकूण थेट ३४ प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. या विश्लेषणामध्ये कला आणि संस्कृतीसंबंधित प्रश्न ग्राह्य़ धरलेले नाहीत. या घटकाची पुढील येणाऱ्या लेखामध्ये स्वतंत्रपणे चर्चा करणार आहोत.

गतवर्षीय परीक्षेत विचारण्यात आलेले काही प्रश्न व त्यांचे स्वरूप.

२०२१ मध्ये –  प्राचीन भारताच्या इतिहासासंदर्भात भवभूती, हस्तिमल आणि क्षेमेश्वर हे का  प्रसिद्ध होते? व यासाठी (अ) जैन साधू (ब) नाटककार (क) मंदिर वास्तुकार आणि (ड)  तत्त्वज्ञ हे चार पर्याय देण्यात आलेले होते. तसेच याव्यतिरिक्त सिंधू संस्कृतीमधील शहर रचना, गुप्तोत्तर कालखंड इत्यादीवर प्रश्न विचारण्यात आलेले होते.

२०२० मध्ये – गुप्त कालखंडात घंटाशाळा, कादुरा आणि चौल ही शहरे कशासाठी प्रसिद्ध होती, अशोकाचे शिलालेख, बौद्ध धर्म इत्यादीवर प्रश्न विचारण्यात आलेले होते. यातील काही प्रश्न हे कला व संस्कृतीच्या पार्श्वभूमीशी संबंधित होते.

२०१९ मध्ये – राजा अशोक याचा उल्लेख असणारा शिलालेख, बौद्ध धर्मातील महायान पंथ, गुप्त काळातील विष्टी हा प्रकार काय होता, हडप्पा संस्कृतीतील ठिकाणे इत्यादीवर प्रश्न विचारण्यात आलेले होते.

२०१८ मध्ये – भारतातील धार्मिक प्रथांच्या संदर्भात ‘स्थानकवाशी’ संप्रदायाचा संबंध कशाशी आहे? हा प्रश्न विचारण्यात आलेला होता व यासाठी बौद्ध धर्म, जैन धर्म, वैष्णव धर्म आणि  शैव धर्म हे चार पर्याय देण्यात आलेले होते.

२०१७ मध्ये – भारताच्या धार्मिक इतिहासाच्या संदर्भात, खालील विधाने ग्राह्य़ धरा व यासाठी अनुक्रमे – सौत्रान्तिका आणि सम्मितीय (Sautrantika and Sammitiya) हे जैन धर्माचे संप्रदाय होते. (विधान पहिले) आणि सर्वस्तीवादिन (Sarvastivadin) यांचे असे मत होते की आविष्काराचे घटक (constituents of phenomena) हे पूर्णत: क्षणिक नाहीत पण ते सदैव अव्यक्त स्वरूपात अस्तित्वात असतात. (विधान दुसरे) व यापैकी कुठले विधान/विधाने योग्य आहे/आहेत, असा प्रश्न विचारण्यात आलेला होता.

२०१६ मध्ये – सर्वप्रथम अशोकाच्या शिलालेखाची उकल कोणी केली आणि यासाठी जॉर्ज बुहलर, जेम्स प्रिन्सिप, मॅक्स मुल्लर आणि विल्लिअम जोनेस असे चार पर्याय दिलेले होते. याव्यतिरिक्त प्राचीन भारतातील श्रेणी व्यवस्था, परकीय प्रवाशाद्वारे प्राचीन भारताचे केलेले वर्णन यासारख्या बाबींवरही प्रश्न विचारण्यात आलेले होते. खालीलपैकी कोणत्या राज्याचा बुद्ध जीवनाशी संबंध होता. यासाठी अवंती, गांधार, कौशल आणि मगध असे चार पर्याय होते व हा प्रश्न २०१४ आणि २०१५ मध्ये लागोपाठ विचारण्यात आलेला होता.

२०१३ मध्ये – बौद्ध धर्माशी संबंधित निर्वाण या संकल्पनेवर प्रश्न विचारण्यात आलेला होता. वैदिक संस्कृतीवर २०१२ मध्ये प्रारंभीच्या वैदिक आर्याचा धर्म कोणता होता अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला होता. याच परीक्षेमध्ये प्राचीन भारताच्या संदर्भानुसार जैन व बौद्ध धर्म  यांना काय एकसारखे होते -दु:ख आणि आणि आनंद या दोन्ही भावनाचा अव्हेर, वेदाबाबत अनास्था अथवा विरक्त्ती, आणि कर्मकांडाचे महत्व अमान्य, असे तीन पर्याय दिलेले होते. २०११ च्या परीक्षेमध्ये सिंधू अथवा हडप्पा संस्कृती वर दोन विधाने देऊन प्रश्न विचारण्यात आलेला होता. यातील पहिले विधान धार्मिक गोष्टीचे अस्तित्व असूनही एक धर्मनिरपेक्ष संस्कृती होती, आणि दुसरे विधान या काळात कापूस वस्त्र निर्मितीसाठी वापरले जात होते, असे होते.

गतवर्षीच्या प्रश्नांच्या विश्लेषणावरून या विषयाची तयारी कशी करावी, याची एक स्पष्ट दिशा आपणाला निर्धारित करता येते. यातील जवळपास सर्व प्रश्न हे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे आहेत. प्राचीन भारताचा अभ्यास करताना याचे विविध टप्प्यानुसार अथवा कालखंडानुसार विभागणी करून संबंधित कालखंडातील सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि राजकीय घडामोडींचे व्यवस्थित आकलन करणे गरजेचे आहे आणि याविषयाची एक व्यापक समज तयार करून अचूक पद्धतीने अभ्यास करावा लागतो.

या विषयाची तयारी करण्यासाठी किती वेळ दयावा हे आधीच निश्चित करणे गरजेचे आहे. तसेच याची तयारी आपण फक्त पूर्व परीक्षेसाठी करत असतो म्हणून पहिल्या प्रथम या विषयाचा सर्वागीण अभ्यास करून स्वत: काढलेल्या नोट्सची वारंवार उजळणी करणे गरजेचे आहे. जरी या विषयावर कमी प्रश्न विचारले जात असले तरी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी जास्तीत जास्त प्रश्न अचूक सोडविणे गरजेचे आहे, त्यामुळे परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या दृष्टीने नमूद अभ्यासक्रमामधील प्रत्येक घटकाची योग्य तयारी करणे अपरिहार्य आहे याची जाणीव असणे गरजेचे आहे.

या घटकाची तयारी करण्यासाठी कोणते संदर्भसाहित्य वापरावे याची चर्चा करू. या घटकाची मूलभूत माहिती अभ्यासण्यासाठी सर्वप्रथम एनसीईआरटीच्या शालेय पुस्तकांचा आधार घ्यावा लागतो आणि या घटकाचे स्वरूप हे पारंपारिक असल्यामुळे अचूक माहिती अभ्यासणे गरजेचे आहे. यासाठी एनसीईआरटीची इयत्ता ८ वी ते १२ वीची इतिहासाची पुस्तके वाचावी लागतात. यामध्ये विशेषकरून इयत्ता १२ वीचे Themes in Indian History part- क हे पुस्तक वाचावे. तसेच आर.एस. शर्मा लिखित प्राचीन भारत या वरील एनसीईआरटीचे जुने पुस्तक वाचणे आवश्यक आहे. या विषयाचा परीक्षाभिमुख अभ्यास करण्यासाठी काही निवडक संदर्भ ग्रंथांचादेखील अभ्यास करावा लागतो. ज्यामध्ये Early India -रोमिला थापर आणि A History of Ancient and Early Medieval India -उपेंद्र सिंग इत्यादी पुस्तकांचा वापर करणे फायद्याचे ठरते.

The post यूपीएससीची तयारी : प्राचीन भारत appeared first on Loksatta.



from करिअर वृत्तान्त – Loksatta https://ift.tt/3G7q0ln
Source https://ift.tt/3dmx3ZV