Advertisement
मुंबई: प्र-कुलपती पदाचा आधी अभ्यास करणे गरजेचे आहे. हे पद समन्वय साधण्यासाठी, समन्वयक म्हणून असेल. राज्यपाल एखाद्या कार्यक्रमाला नसतील तर प्रकुलगुरु जाऊ शकतील. यामुळे राज्यपाल पदाचा अपमान होणार नाही असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री यांनी म्हटले. पदावरुन विरोधकांनी केलेल्या टिकेला उत्तर देताना ते बोलत होते. जे शिकलेले नाहीत ते देखील कुलगुरु होऊ शकतात असा आरोप देखील विरोधकांकडून करण्यात आला. पण कुलगुरु निवडताना सर्व प्रक्रिया पार पाडली जाईल. राज्यपालांच्या समितीकडून पाच नावे राज्य शासनाकडे येतील. त्यातून २ नावे शॉर्टलिस्ट करुन राज्यपालांकडे जातील. त्यातून एक नाव राज्यपाल निवडणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. न्यू एज्युकेशन पॉलिसीची अंमलबजावणी करताना केंद्र आणि राज्यामध्ये चांगला समन्वय असावा. यासाठी प्र-कुलपती हे पद आहे. भाजपचे सरकार असलेल्या उत्तर प्रदेश, कर्नाटक येथील विद्यापीठात देखील हे पद आहे. यामध्ये वाद करण्यासारखे काही नसल्याचेही ते म्हणाले. समिती आज देखील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली काम करत आहे. राज्य सरकारने कोणतीही यंत्रणा हातात घेतली नाही, आम्ही घेतलेला निर्णय पारदर्शी असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. मुंबई विद्यापीठातील जागा दिनानाथ मंगेशकर महाविद्यालयासाठी तसेच स्कील इंडिया कार्यक्रमासाठी मागण्यात आली आहे. यामुळे कोणाच्या पोटात दुखण्याचे कारण नसल्याचेही ते म्हणाले.
source https://maharashtratimes.com/career/career-news/governor-post-will-not-be-insulted-says-higher-and-technical-education-minister-uday-samant/articleshow/88318378.cms