Advertisement
टाइम्स वृत्त, नवी दिल्ली सन २०१२-१३पासून २०१९-२० या काळात शाळेत जाणाऱ्या मुलांच्या संख्येत सुमारे ३३ लाखांची घट झाली आहे. शिक्षणासाठीची एकात्मिक जिल्हा माहिती यंत्रणेने (यूडाइस) प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे. अरुण मेहता यांनी या संदर्भात एक शोध निबंध प्रकाशित केला असून, त्यामध्ये ही बाब अधोरेखित करण्यात आली आहे. शाळेत जाणाऱ्यांच्या संख्येत घट झाल्याने सन २०२३पर्यंत प्रत्येकाला शिक्षण या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टाला धक्का बसण्याची शक्यता आहे. सन २०१२-१३ मध्ये शाळेत जाणाऱ्यांची संख्या २५.४८ कोटी होती, ती हळूहळू कमी होऊन २०१९-२०मध्ये २५ कोटी झाली. या संदर्भात मेहता म्हणाले, ‘गेल्या दशकभरात पहिली ते बारावीपर्यंतच्या एकूणच पटसंख्येत घट झाली आहे. मुलांच्या लोकसंख्येच्या तुलनेत ही घट अधिक प्रमाणात आहे. पटसंख्येतील ही घट निश्चितच काळजी करण्याजोगी आहे. ही घट होण्यामागील कारणांचा शोध घेण्याऐवजी सरकार २०१८-१९च्या तुलनेत १९-२०मध्ये पटनोंदणीत वाढ झाल्याचे सांगून दिशाभूल करीत आहे. २०१८-१९मधील पटनोंदणी दशकात सर्वांत कमी होती.’ त्या वर्षी शालेय विद्यार्थ्यांची एकूण २४.८३ कोटी होती. गेल्या दशकभरात सर्वाधिक पटसंख्या २०१५-१६मध्ये २६.०६ कोटी होती. ती २०१८-१९मध्ये २४.८३ कोटींपर्यंत खाली आली. १९-२०मध्ये हा आकडा २५ कोटी झाल्यामुळे सरकार फक्त त्यावरच भर देत आहे. प्रत्यक्षात २०१८-१९चा अपवाद वगळता अन्य सर्व शैक्षणिक वर्षांच्या तुलनेत ही पटसंख्या कमी आहे. विद्यार्थी वाढले; घटल्या सन २०१८-१९च्या तुलनेत त्यापुढील वर्षी पटसंख्येत वाढ झाली असली, तरीही त्या वर्षी सरकारी शाळांची संख्या सुमारे ५० हजारांनी कमी झाल्याचे ‘युडाइस’च्या अहवालात म्हटले आहे. ही घट २०१२-१३पासूनची सर्वाधिक आहे. त्याच वेळी खासगी शाळांची संख्या मात्र, वाढल्याचे दिसते. निति आयोगाच्या शाळांचे एकत्रीकरण आणि व्यवहार्यीकरण या धोरणानुसार हजारो सरकारी शाळा बंद करण्यात आल्यामुळे तसे दिसते आहे. सन २०१२-१३ मधील शाळेत जाणाऱ्यांची संख्या - २५.४८ कोटी सन २०१९-२० मधील शाळेत जाणाऱ्यांची संख्या - २५ कोटी
source https://maharashtratimes.com/career/career-news/school-education-33-lakh-students-drop-in-school-enrollment-in-last-8-years/articleshow/88255065.cms