
म.टा. प्रतिनिधी, नागपूर पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या शिक्षकांची पदभरती २०२२-२३ हे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच केली जाण्याचे संकेत आहेत. त्यासंदर्भातील वेळापक्षक शिक्षण विभागाने प्रसिद्ध केले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पदांकरिताची ही भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक पात्रता परीक्षा २१ नोव्हेंबर रोजी आयोजित केली होती. या परीक्षेचा निकाल ३१ डिसेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर, पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या रिक्त पदांसाठीची भरती राबविली जाणार असल्याची माहिती आहे. शासनाच्या वेळापत्रकानुसार, २८ फेब्रुवारी रोजी टीएआयटी परीक्षा घेण्यात येईल आणि १० मार्च रोजी निकाल जाहीर करण्यात येईल. मार्च महिन्यापासून राज्याच्या १३ पेसा क्षेत्रातील रिक्त पदभरतीसाठी जाहिरात देण्यात येईल. १६ ते ३१ मार्चपर्यंत उमेदवारांना प्राधान्यक्रम देण्याची मुदत देण्यात येईल. उमेदवार निवडीची ही प्रक्रिया ३० एप्रिलपर्यंत चालणार आहे. त्यानंतर पात्र उमेदवारांना नियुक्तीचे आदेश देण्यात येतील. असे आदेश मिळालेल्या उमेदवारांना नव्या शैक्षणिक सत्राच्या शाळा सुरू होताच रूजू करून घेण्यात येईल, अशी माहिती आहे. पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या शिक्षकांची पदभरती करण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री अॅड. वर्षा गायकवाड यांनी नुकतेच दिले होते.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dqpx1o
Source https://ift.tt/310mqee
0 टिप्पण्या