Advertisement
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद शिक्षक पात्रता परीक्षेच्या (TET) निकालासाठी ( 2021) नवीन वर्ष उजाडण्याची शक्यता आहे. अंतरिम उत्तरसूचीनंतर परीक्षा परिषदेकडे २५०पेक्षा अधिक तक्रारी आल्या आहेत. तक्रार अर्जातील आक्षेपांची छाननी केल्यानंतर निकालाची प्रक्रिया होणार आहे. राज्यात तीन लाख ६० हजार विद्यार्थ्यांचे निकालाकडे लक्ष आहे. करोना पार्श्वभूमीवर, 'टीईटी' दोन वर्षांपासून रखडली होती. डीएड, बीएड पात्रताधारक दोन वर्षापासून प्रतीक्षेत असलेली परीक्षा २१ नोव्हेंबरला घेण्यात आली. शिक्षक भरतीची प्रक्रिया रखडल्याने परीक्षेला नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली होती. त्यात दोन वर्षे परीक्षा झाली नसल्याने, यंदा परीक्षार्थी विद्यार्थ्यांची नोंदणी वाढली होती. 'प्राथमिक स्तरावरील पेपर-१' व 'माध्यमिक स्तरावरील पेपर-२'साठी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या तीन लाख ६० आहे. यापैकी औरंगाबाद केंद्राहून १९ हजार ९५६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. परीक्षेनंतर परीक्षा परिषदेने अंतरिम उत्तरसूची जाहीर केली. अंतरिम सूचीवर आक्षेप नोंदविण्यासाठी विद्यार्थ्यांना आठ दिवसांचा कालावधी देण्यात आला. यामध्ये तक्रारी मोठ्या प्रमाणात आल्या आहेत. परिषदेकडून छाननी प्रक्रिया सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. आक्षेपांची संख्या २५०पेक्षा अधिक असून, यामध्ये प्रश्नांमधील चुकांमुळे वाक्याचा अर्थ बदल, शब्दाचा अर्थ बदल त्यामुळे परीक्षाथींमध्ये संभ्रम निर्माण झाल्याच्या तक्रारींसह काही माध्यमांच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न चुकलेली असल्याचे आक्षेपात म्हटल्याचे सांगण्यात येते. आक्षेपांच्या छाननीमध्ये तथ्यता तपासूण अंतिम सूची जाहीर केली जाणार आहे. ही सगळी प्रक्रिया डिसेंबर अखेरपर्यंत चालेल व निकाल जानेवारीत जाहीर केला जाऊ शकतो, असे सांगण्यात येते. परीक्षेनंतर विद्यार्थ्यांचे निकालाकडे लक्ष लागले आहे. टीईटीनंतर विद्यार्थ्यांचे अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेकडे लक्ष लागले आहे. परीक्षा घेण्यास सरकारने मान्यता दिली. त्यामुळे या परीक्षेच्या वेळापत्रकाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ycq8xn
Source https://ift.tt/310mqee