Advertisement
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई राज्यातील करोनाचा संसर्ग हळूहळू कमी होत असल्याने राज्यातील बंद असलेल्या पुन्हा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारी होणाऱ्या बैठकीत चर्चा होणार असून तेव्हाच अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली. शाळा सुरू करण्यासंदर्भातील मागणी मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात येणार आहे. सध्या आपण १५ फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद ठेवल्या आहेत. मात्र सध्याची परस्थिती पाहता, त्या त्यापूर्वी खुल्या करण्याचा निर्णय होऊ शकतो, असे कडू यांनी नमूद केले. उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या कोल्हापूर येथे आहेत. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाची बुधवारी होणारी बैठक गुरुवारी होणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील करोनास्थिती नियंत्रणात असल्याने शाळा लवकर सुरू करण्याचा निर्णय होऊ शकतो, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे सर्वांचे लक्ष आता या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे लागून राहिले आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/maharashtra-school-reopening-decision-likely-to-be-taken-in-cabinet-meeting/articleshow/88987436.cms