Advertisement
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई शिक्षण हक्क कायद्यांतर्गत राखीव २५ टक्के कोट्यातील () प्रवेश प्रक्रियेला १७ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. अवघ्या चार दिवसांतच पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कालावधीत राज्यामध्ये तब्बल ४० हजार २९३ अर्ज पालकांकडून करण्यात आले. नागपूर व मुंबईतून सर्वाधिक अर्ज आले आहेत. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकारांतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येतात. आरटीई प्रवेशासाठी संपूर्ण राज्यातून आठ हजार ६७९ शाळांनी नोंदणी केली आहे. या शाळांमध्ये ९६ हजार ६० जागा आहेत. १ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेला तांत्रिक अडचणींमुळे १७ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. १७ ते २० फेब्रुवारी या चार दिवसांमध्ये राज्यभरातून आरटीई प्रवेशासाठी तब्बल ४० हजार २९३ अर्ज आले. यामध्ये नागपूरमध्ये सर्वाधिक ११ हजार ४५५ अर्ज आले आहेत. त्याखालोखाल मुंबईमधून ४ हजार ६२०, औरंगाबाद ३ हजार ७४३, नाशिक ३ हजार ३३१, जळगाव २ हजार २२२ आणि अमरावतीमधून १ हजार ७२२ इतके अर्ज आले आहेत. मात्र अद्याप ११ जिल्ह्यांमध्ये आरटीई प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली नाही. त्यामुळे या जिल्ह्यांतील पालक आरटीई प्रवेश प्रक्रियेला कधीपासून सुरुवात होणार आहे, याकडे लक्ष लावून बसले आहेत.
source https://maharashtratimes.com/career/career-news/rte-admission-2022-huge-response-in-state-including-mumbai-and-nagpur-from-parents/articleshow/89718826.cms