Advertisement
म. टा. प्रतिनिधी, पुणे येत्या चार मार्चपासून सुरू होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी (Maharashtra Hsc Exam 2022) विद्यार्थ्यांना तीन मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहे. बारावीसाठी अजूनही अर्ज करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना ३ मार्च सकाळी ११ पर्यंत अर्ज करून शुल्क भरण्याची मुभा देण्यात आली आहे. ३ मार्चला सकाळी ११ नंतर वेबसाइट बंद केली जाईल, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना परीक्षेचे अर्ज करण्यासाठी कोणत्याही पद्धतीच्या अडचणी येऊ नयेत म्हणून राज्याच्या शिक्षण विभागाने यंदा प्रथमच विद्यार्थ्यांना शेवटच्या दिवसांपर्यंत परीक्षेचा ऑनलाइन अर्ज करण्याची मुभा दिली आहे. बारावीची परीक्षा चार मार्चपासून होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना तीन मार्च सकाळी ११ पर्यंत अर्ज आणि शुल्क भरून परीक्षेला बसता येणार आहे. एखाद्या विद्यार्थ्याने आदल्या दिवशी अर्ज भरला, तर त्या विद्यार्थ्याचे प्रवेशपत्र तातडीने तयार केले जाणार असून ऑनलाइन पद्धतीने ते विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवले जाईल, असेही राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप बारावीचे अर्ज भरलेले नाहीत किंवा ज्यांना बारावीच्या परीक्षेस बसण्याची इच्छा असून करोना किंवा इतर कौटुंबिक कारणांमुळे अर्ज भरता आलेले नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी तातडीने ऑनलाइन अर्ज भरावेत, असे आवाहन राज्य मंडळाकडून करण्यात आले आहे. सर्व कनिष्ठ महाविद्यालये, शाळा, संबंधित प्राचार्य यांनी या वृत्ताची नोंद घेऊन अद्याप अर्ज करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना तातडीने अर्ज करण्यास सांगावे, अशा सूचनाही राज्य मंडळाकडून देण्यात आल्या आहेत. चार मार्चपासून बारावीची लेखी परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी आदल्या दिवशीपर्यंत अर्ज करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. त्यानुसार तीन मार्चपर्यंत सकाळी ११ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना तातडीने प्रवेशपत्र देण्याची व्यवस्था करण्यात येईल. अर्ज करताना विद्यार्थ्यांनी आपली अचूक माहिती भरावी. - अशोक भोसले, सचिव, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ
source https://maharashtratimes.com/career/career-news/hsc-exam-2022-students-can-registered-for-12th-exam-till-previous-day-of-exam-i-e-3rd-march/articleshow/89914245.cms