Advertisement
Leaked: महाराष्ट्र बोर्ड उच्च माध्यमिक म्हणजेच बारावी परीक्षेचा रसायनशास्त्राचा पेपर (Chemistry Paper) पुन्हा घेण्याची मागणी जोर धरु लागली आहे. हा पेपर आधीच विद्यार्थ्यांच्या हाती लागल्याचे वृत्त सोशल मीडियातून समोर आले आहे. दरम्यान शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड ( Minister ) यांनी यासंदर्भात विधिमंडळात माहिती दिली आहे. १२ मार्च शनिवारी रसायनशास्त्राचा पेपर फुटला (Chemistry Paper Leaked) अशी माहिती सोशल मीडियातून समोर आली. बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर नियमानुसार दहा मिनिटे आधी देण्यात आला. म्हणजेच दहा वाजून वीस मिनिटांनी प्रश्नपत्रिका वाचनासाठी देण्यात येते आणि प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेवरुन उत्तर लिहिण्यास १० वाजून ३० मिनिटांनी सुरुवात होते अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. विलेपार्ले येथील परीक्षा केंद्र क्रमांक ३,६०१ वरील एका विद्यार्थीनीच्या मोबाइलवर १० वाजून २४ मिनिटांनी प्रश्नपत्रिका आली. ही वेळ पेपर वाचायला देण्यात आलेली होती. प्रश्नपत्रिकेतील काही भाग व्हाट्सअॅपद्वारे व्हायरल झाल्याचे आढळून आले आहे. त्याबाबत स्थानिक पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी याची सखोल चौकशी केल्याचे त्या म्हणाल्या. एसएससी बोर्डाने केलेल्या चौकशीनुसार, १० वाजून २० मिनिटांनी प्रश्नपत्रिकेचा काही भाग मोबाईलवर आढळला आहे. ही वेळ पेपर वाचनासाठी देण्यात आल्याने हा पेपर फुटला नसल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले. असे असले तरीही हे प्रकरण गंभीर आहे. मोबाइलचा गैरवापर करुन कोणाच्यातरी माध्यमातून यातील काही भाग पुढे गेला. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असेही त्या म्हणाल्या.
source https://maharashtratimes.com/career/career-news/maharashtra-board-exam-hsc-paper-has-not-been-leaked-explanation-from-education-minister-varsha-gaikwad/articleshow/90196697.cms