
राज्य मंडळामार्फत इयत्ता दहावीचा निकाल घोषित करताना उद्भवलेल्या त्रुटींसंदर्भातली चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती येत्या १५ दिवसात आपला अहवाल सादर करणार आहे. राज्याच्या शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठित करण्यात आली आहे. राज्याचे माहिती व तंत्रज्ञान विभागाचे सचिव, उद्योग ऊर्जा आणि कामगार विभागाचे उपसचिव, शालेय शिक्षण विभागाचे तांत्रिक सल्लागार या समितीतील सदस्य आहेत, तर शिक्षण उपसंचालक या समितीचे सदस्य सचिव आहेत. समिती पुढील मुद्द्यांबाबतची चौकशी करणार आहे - - निकालापूर्वी राज्य मंडळाच्या अध्यक्षांनी सर्व संबंधितांसोबत बैठक आयोजित केली होती का? - निकाल घोषित करण्यासंबंधी राज्य मंडळातील संबंधित तांत्रिक सल्लागारांना पूर्वसूचना देण्यात आली होती का? - संकेतस्थळाची देखभाल करणाऱ्या संबंधित कंपनीला निकाल घोषित करण्यापूर्वी पूर्वसूचना देण्यात आली होती का? - निकाल जाहीर करण्यापूर्वी संकेतस्थळाची पूर्वतपासणी (trial run) केली होती का? - निकाल घोषिक करण्यासाठी आवश्यक असलेल्या क्षमतेच्या सर्व्हरचा वापर करण्यात आला होता का? या समितीच्या स्थापनेबाबतचा शासन आदेश सरकारने जारी केला आहे. दहावीचा निकाल शुक्रवारी १६ जुलै रोजी जाहीर करण्यात आला. हा निकाल https://ift.tt/2U7pMIW या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजल्यापासून पाहता येणार होता. मात्र निकाल जाहीर झाला, पण विद्यार्थ्यांना तो सायंकाळी उशिरापर्यंत पाहता आला नव्हता. राज्यात यंदा दहावीला १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3wNk3F6
via nmkadda
0 टिप्पण्या