Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, ३ मार्च, २०२२, मार्च ०३, २०२२ WIB
Last Updated 2022-03-03T09:00:55Z
Rojgar

SSC HSC Exam 2022: परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न? बोर्डाच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांना दिला 'हा' दिलासा

Advertisement
म. टा. प्रतिनिधी, पुणे 'राज्यात दोन वर्षे करोनाचा प्रादुर्भाव होता, हे लक्षात घेऊन सर्वसामान्य विद्यार्थ्यांना सोडविता येतील असेच प्रश्न दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विचारले जातील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तणावमुक्त राहून आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी,' असे सांगून 'राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा'चे अध्यक्ष यांनी बुधवारी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविला. राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षेला उद्या, शुक्रवारी चार मार्चपासून आणि दहावीच्या परीक्षेला १५ मार्चपासून सुरुवात होणार आहे. या परीक्षांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावे आणि त्यांच्या मनातील शंका दूर व्हाव्यात, या उद्देशाने गोसावी यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'च्या फेसबबुक लाइव्हद्वारे विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधला. दहावी आणि बारावीच्या परीक्षेची तयारी पूर्ण झाली असून, विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता परीक्षा देण्याचे आवाहन गोसावी यांनी केले. एसटी संपामुळे ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यात अडचणी येऊ शकतात. ही परिस्थिती लक्षात घेउन विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी शिक्षक, मुख्याध्यापकांनी मदत करावी, अशी सूचना केल्याचेही गोसावी यांनी सांगितले. 'परीक्षेसाठी प्रत्येक पेपरला विद्यार्थ्यांना तीस मिनिटांचा अतिरिक्त कालावधी देण्यात येणार आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रातील परीक्षा साडेदहा वाजता सुरू होणार आहेत. वाहतूक कोंडी, करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रावरील सुरक्षित नियमावली आदींचा विचार करून साधारण तासाभरापूर्वी परीक्षा केंद्रावर पोहोचण्याचे नियोजन करावे,' असा सल्ला गोसावी यांनी दिला. राज्यात करोनाचा प्रादुर्भाव होता; तसेच ऑनलाइन शिक्षण घेण्यावर मर्यादा होत्या, याचे भानही राज्य मंडळाला आहे. मात्र, दहावी आणि बारावीची परीक्षा एकाच वेळी संपूर्ण राज्यात होते. या परीक्षांसाठी लाखो विद्यार्थी बसत असल्याने, ऑनलाइन परीक्षांचा पर्याय योग्य नव्हता. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने, लेखी परीक्षा सुरळीत होणार आहे. त्यासाठीची सर्व आवश्यक तयारी मंडळाने केली आहे. दहावी किंवा बारावीच्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांना सोडविता येतील, याच दृष्टीने प्रश्नपत्रिका तयार करण्यात येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेबाबत कोणतीही भीती न बाळगता, आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी, असेही गोसावी यांनी स्पष्ट केले. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी फेसबुकवरून साधलेला लाइव्ह संवाद थेट ऐका - 'परीक्षा अन् निकाल वेळेतच' राज्य मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून, बारावीचे परीक्षा साहित्य परीक्षा केंद्रावर पोहोचले आहे. दहावीचे परीक्षा साहित्यही येत्या काही दिवसांत केंद्रांवर पोहोचणार आहे. त्यामुळे परीक्षा वेळेत संपणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार बारावीचा निकाल १० जूनपूर्वी जाहीर करायचा असतो. त्यामुळे यंदा तो मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्याचा आमचा मानस आहे. त्यानंतर काही दिवसांत दहावीचा निकाल प्रसिद्ध होईल. त्यामुळे बारावी आणि दहावीनंतरच्या उच्च शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रिया वेळेत होऊ शकतील. याद्वारे शैक्षणिक वर्ष सुरळीत करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे, अशी माहिती गोसावी यांनी दिली. 'फेरपरीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये' एखाद्या विद्यार्थ्याला करोनाची बाधा झाल्यास, त्याची स्वतंत्र व्यवस्था परीक्षा केंद्रात करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे एखाद्या विद्यार्थ्याला वैद्यकीय कारणांमुळे परीक्षा देता आली नाही, तर घाबरण्याचे कारण नाही. यंदाची फेरपरीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये होणार असून, त्याचा निकाल पंधरा दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही, याची काळजी मंडळाने घेतली असल्याचे गोसावी यांनी सांगितले. पालकांनी विद्यार्थ्यांवर परीक्षेचे दडपण आणू नये. या काळात ते अधिक आनंदी कसे राहतील, याचा विचार करावा. त्यांच्यावर कोणतेही मानसिक दडपण येणार नाही; तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. - शरद गोसावी, अध्यक्ष, राज्य मंडळ


source https://maharashtratimes.com/career/career-news/maharashtra-ssc-hsc-exam-2022-difficulty-level-of-questions-will-be-easy-assured-board-chairman-sharad-gosavi/articleshow/89963469.cms