Advertisement
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. यामुळे जापर्यंत लसीकरण होत नाही, तोपर्यंत कोणतीही परीक्षा पारंपरिक पद्धतीने घेऊ नये असा सूर रविवारी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या देशभरातील शिक्षणमंत्र्यांच्या बैठकीत उमटला. त्यामुळे बारावीची परीक्षाही पारंपरिक पद्धतीने न होता इतर पर्यायांच्या माध्यमातून होईल, असा अंदाज बांधण्यात येत आहे. दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सीबीएसईने घेतला. त्यानंतर बहुतांश राज्याच्या शिक्षण मंडळांनी दहावीची परीक्षा रद्द केली. आता बारावीच्या परीक्षेचे काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी रविवारी देशभरातील राज्यांचे शिक्षणमंत्री आणि शिक्षण विभागातील अधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत विविध राज्यांचे परीक्षांबाबत काय मत आहे, हे जाणून घेण्यात आले. बहुतांश राज्यांची बारावी परीक्षा घेण्याची तयारी पूर्ण झाली आहे. मात्र सध्याच्या करोनास्थितीत प्रत्यक्ष केंद्रावर परीक्षा घेणे अवघड असल्याचे मत मांडले. याचबरोबर मूल्यांकनाची एकसमान पद्धत असावी, अशी गरजही यावेळी मांडली. --'विद्यार्थ्यांवरील ताण लक्षात घ्यावा' राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही सध्याच्या करोनाकाळात विद्यार्थ्यांच्या आरोग्याला महत्त्व देणे आवश्यक आहे. यामुळे बारावीसाठी परीक्षा न घेता इतर मार्गाने मूल्यांकनाचा विचार करावा, असे मत मांडले. सद्यस्थितीमध्ये विद्यार्थ्यांच्या मानसिक स्थितीचाही विचार करणे आवश्यक आहे. विद्यार्थी आणि पालक आम्हाला भेटून त्यांच्यावर येणारा ताण सांगत असतात. यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण देणे योग्य राहणार नाही, असेही त्या म्हणाल्या. याचबरेाबर बारावीनंतर बहुतांश व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते. यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यासाठी वेगळ्या पद्धतीचा विचार करावा, असे मत तज्ज्ञ मांडत आहेत असेही त्यांनी सांगितले. याचबरोबर यंदाचे विद्यार्थी १४ महिन्यांहून अधिक काळ हे बारावीच्या ओझ्याखाली आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता परीक्षेबाबत लवतरात लवकर निर्णय घेऊन त्यांना दिलासा देणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी यावेळी मांडले. सर्व शिक्षण मंडळांची एक समान मूल्यांकन पद्धत असावी. याचबरोबर सर्व शाळांतील शिक्षक, विद्यार्थी यांचे लसीकरण होणेही आवश्यक असल्याचे मत गायकवाड यांनी मांडले. दिल्लीचे शिक्षणमंत्री मनिष सिसोदिया यांनीही लसीकरण झाल्याशिवाय परीक्षा घेणे उचित ठरणार नाही असे मत मांडले. --पर्यायांचा विचार परीक्षांना कोणते पर्याय असतील याबाबत चर्चा करत असताना विद्यार्थ्यांना घरी कार्यपुस्तिका देऊन परीक्षा घेणे, अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करणे अशा विविध पर्यायांवर यावेळी चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर सर्वांची मते जाणून घेतली असून लवकरच विद्यार्थी हिताचा निर्णय जाहीर करण्यात येईल तसेच कोणत्या प्रकारे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करता येऊ शकेल याबाबतच्या सूचना राज्यांना दिल्या जातील, असे केंद्रीय शिक्षणमंत्री पोखरीयाल यांनी सांगितले. --सीओबीएसईबाबत नाराजी देशभरातील सर्व शालेय शिक्षण मंडळांशी संलग्न असलेल्या 'कौन्सिल ऑफ बोर्ड ऑफ स्कूल एज्युकेशन इन इंडिया'ने (सीओबीएसई) करोनाकाळात सर्वांना एकत्र घेऊन कोणतीही चर्चा घडविली नाही, याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली. याचबरोबर या मंडळाच्या बैठका वेळोवेळी व्हाव्यात, अशी सूचनाही त्यांनी केली. या मंडळाच्या निष्क्रियेतेबाबत 'मटा'ने १७ एप्रिलला वृत्त प्रसिद्ध केले होते.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3u99fQw
via nmkadda