Advertisement
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे पॉलिटेक्निक उन्हाळी परीक्षेसाठी परीक्षा पद्धतीत बदल करण्यात आले आहेत. चाळीस प्रश्नांच्या प्रश्नपत्रिकेतील ३५ प्रश्न विद्यार्थ्यांना सोडविणे बंधनकारक आहे. त्यासह विद्यार्थ्यांवर पर्यवेक्षकांचे ऑनलाइन मॉनिटरिंग असणार आहे. १३ जुलैपासून परीक्षा सुरू होत असून, औरंगाबाद विभागात एक लाख १६ हजार ७३६ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तंत्रशिक्षण मंडळाने उन्हाळी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार १४ जूनपासून परीक्षेचा टप्पा सुरू होत आहे. यामध्ये १४ जून ते १६ जून क्लास टेस्ट असणार आहे. २२ जून ते तीन जुलैदरम्यान प्रात्यक्षिक परीक्षा, तर तेरा जुलै ते तीन ऑगस्टदरम्यान ऑनलाइन परीक्षा असणार आहे. करोना पार्श्वभूमीवर ऑनलाइन परीक्षा होत आहे. उन्हाळी सत्राच्या परीक्षेत दुसरे, चौथे आणि सहाव्या सत्रातील विद्यार्थी परीक्षार्थी आहेत. मागच्या सत्रातील परीक्षेपेक्षा उन्हाळी सत्रातील परीक्षेत अनेक बदल करण्यात आले आहेत. परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन मॉनिटरिंग, स्लॉटचा कालावधी असे अनेक बदल करण्यात आले आहेत. प्रात्यक्षिक परीक्षा ऑनलाइन प्रणालीचा वापर करून तोंडी पद्धतीने संस्थास्तरावर घेण्यात येणार आहे. शक्य नसल्यास टेलिफोनिक पद्धतीने प्रात्यक्षिक परीक्षा संस्था स्तरावर घेण्यात यावी, सर्व प्रयत्नानंतरही विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा घेणे शक्य नसल्यास अशा विद्यार्थ्यांना सत्र जर्नल्स, निरंतर मूल्यमापनाच्या आधारावर मूल्यमापन करून गुण देण्यात यावेत, अशा सूचना प्राचार्यांना देण्यात आल्या आहेत. औरंगाबाद विभागात एक लाख १६ हजार ७३६ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यामध्ये एक लाख चार हजार ४८० नियमित, तर बारा हजार २५६ विद्यार्थी पुर्नपरीक्षार्थी आहेत. परीक्षा पद्धतीतील बदल ऑनलाइन परीक्षेत प्रश्पत्रिकेत ४० प्रश्न विचारले जातात. त्यातील ३५ प्रश्न सोडविणे आवश्यक असणार आहे. यापूर्वीच्या सत्रात ३० प्रश्न सोडविणे आवश्यक होते. परीक्षेत विद्यार्थ्यांना दोन तासांचा स्लॉट देण्यात आला आहे. पूर्वीच्या सत्र परीक्षेत तीन तासांचा कालावधी होता. पर्यवेक्षकांमार्फत ऑनलाइन मॉनिटरिंग करण्यात येणार आहे. परीक्षेतील बदल चांगले आहेत. परीक्षार्थ्यांवर पर्यवेक्षकांचे मॉनिटरिंगही असणार आहे. परीक्षार्थी, संस्थांनाही याबाबत माहिती, सूचना देण्यात आल्या आहेत. अक्षय जोशी, विभागीय उपसचिव, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, औरंगाबाद मागील परीक्षा विचारात घेऊन या सत्रात अनेक बदल करण्यात आले. बदलामुळे परीक्षेतील काठीण्य पातळी निश्चित वाढेल आणि अधिक गुणवत्तापूर्ण सुरळीत परीक्षा पार पडेल. गणेश डोंगरे, प्राचार्य, सीएसएमएसएस पॉलिटेक्निक कॉलेज
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/34XQghH
via nmkadda