Advertisement

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेसाठी (FYJC CET) राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने प्रश्नसंच (Question Bank) उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पालक, शिक्षक व विद्यार्थी करत आहेत. याबाबत परिषदेनेही ट्विटर सर्वेक्षण सुरू केले असून अल्पावधीत ८१ टक्के प्रतिसादकर्त्यांनी प्रश्नसंच उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली आहे. दहावीची परीक्षा न झाल्याने इयत्ता नववीची परीक्षा आणि दहावीच्या वर्षभरात झालेल्या ऑनलाइन परीक्षा यातील गुणांचा विचार करून विद्यार्थ्यांना गुणदान केले जाणार आहे. यामुळे अकरावी प्रवेशासाठी नामांकित कॉलेजांमध्ये चढाओढ पाहवयास मिळणार आहे. हे टाळण्यासाठी व सर्वांना समान संधी मिळण्यासाठी अकरावी प्रवेशासाठी यंदा प्रथमच प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. अर्थात ही परीक्षा ऐच्छिक आहे. असे असले तरी चांगले गुण मिळणारे विद्यार्थी नामांकित कॉलेजांत प्रवेशासाठी ही परीक्षा देण्याची तयारी करत आहेत. मात्र प्रथमच होणाऱ्या या परीक्षेत किती काठिण्य पातळीचे प्रश्न येतील, प्रश्नांचा आराखडा कसा असेल, चार विषयांचे वगेवेगळे विभाग असतील की संमिश्र प्रश्न असतील असे अनेक प्रश्न विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना पडले आहेत. यामुळे प्रथमच पार पडणाऱ्या या परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना प्रश्नसंच उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे. याबाबत मंगळवारी परिषदेने ट्विटर सर्वेक्षण सुरू केले आहे. हे सर्वक्षण बुधवारी संध्याकाळपर्यंत सुरू राहणार आहे. मात्र रात्री उशिरापर्यंत झालेल्या सर्वेक्षणात ८१ टक्के प्रतिसादकर्त्यांनी प्रश्नसंच उपलब्ध करून देण्याबाबत होकार कळविला आहे. यावर परिषद काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hG5lKD
via nmkadda