Advertisement
Constitution Day: भारतीय संविधान दिनानिमित्त केंद्र सरकारने ऑनलाइन प्रश्नमंजुषा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय राज्यघटना आणि लोकशाही याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी ही ऑनलाइन प्रश्नमंजुषा सुरू करण्यात आली आहे. यासाठी एक पोर्टल तयार करण्यात आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद २६ नोव्हेंबर रोजी संसदेच्या सेंट्रल हॉलमधून ऑनलाइन प्रश्नमंजुषेशी संबंधित पोर्टल लॉन्च करणार आहेत. डिजीटलचे वाढते युग पाहता हा कार्यक्रम केवळ ऑनलाइन ठेवण्यात आला आहेत. या कार्यक्रमात भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात लोकशाहीवरील प्रश्न, त्यात अंतर्भूत मूलभूत कर्तव्ये यांचा समावेश करण्यात आला आहे. कोणत्याही वयोगटातील व्यक्ती या प्रश्नमंजुषा स्पर्धेत भाग घेऊ शकतात. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पोर्टलवर नाव, पत्ता आणि क्रमांक देऊन नोंदणी करावी लागेल. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांना प्रमाणपत्रही देण्यात येणार असल्याचे संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले. भारतीय संविधान आणि संसदीय लोकशाहीची मूल्ये लोकप्रिय करणे हा क्वीजचा उद्देश आहे. ही क्वीज हिंदी आणि इंग्रजी भाषेत आयोजित करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. संविधान दिनाविषयी दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. अनेक चर्चा आणि दुरुस्त्या करून२६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान स्वीकारण्यात आले. २६ नोव्हेंबर हा दिवस पहिल्यांदा कायदा दिन म्हणून साजरा करण्यात आला. १९३० मध्ये काँग्रेसच्या लाहोर परिषदेत पूर्ण स्वराज्याची प्रतिज्ञा मंजूर करण्यात आली होती. या घटनेच्या स्मरणार्थ संविधान दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर १९ नोव्हेंबर २०१५ रोजी सामाजिक न्याय मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयानुसार २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. लोकांमध्ये संविधानाविषयी जागृती व्हावी आणि संविधानिक मूल्यांचा प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला. 'माझे संविधान,माझा अभिमान' राज्यातील शाळांमध्ये 'माझे संविधान,माझा अभिमान' उपक्रम राबविण्यात येणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भातील माहिती दिली. महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसह भारतीय संविधानाच्या निर्मितीत हातभार लावलेल्या त्या तमाम व्यक्तिमत्वांना अभिवादन करणे,आदरांजली वाहणे;त्याचप्रमाणे संविधानातील मूलतत्त्वे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवणे व त्यांना जागरूक नागरिक बनवणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. कायदे म्हणजे काय? कायदे कशासाठी? राज्यघटना नेमका काय प्रकार आहे?असे अनेक प्रश्न बालमित्रांना पडतात.भारतीय राज्यघटनेतील व्यापक मूलतत्त्वे, सर्वसमावेशकता विद्यार्थ्यांच्या मनावर कोरली जावीत याअनुषंगाने 'माझे संविधान,माझा अभिमान' उपक्रम राबवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतल्याचे वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3oWwuwB
via nmkadda