Advertisement
![](https://maharashtratimes.com/photo/87548297/photo-87548297.jpg)
म. टा. प्रतिनिधी, पुणे: राज्यातील पहिली ते बारावीच्या शाळांना यंदा दिवाळीच्या सुट्ट्या कमी मिळाल्याने, विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर दिवाळीच्या उर्वरित सुट्ट्या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (एनएएस) परीक्षेनंतर, नाताळात किंवा उन्हाळी सुट्ट्यांमध्ये घेण्याची मुभा शालेय शिक्षण विभागाने दिली आहे. याबाबतचा निर्णय स्थानिक स्तरावर शाळांना घ्यावा लागणार आहे.दरम्यान ११ आणि १२ नोव्हेंबरला शाळेत यावे लागणार असल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांच्या निमित्ताने अनेकांचे पर्यटन आणि गावाकडे जाण्याचे नियोजन असते. त्या दृष्टीने अनेकांचे नियोजन असते. त्यामुळे राज्यातील बहुतांश एनएएस परीक्षा झाल्यावर, सुट्ट्या घेऊ शकतात. मात्र, एनएएस परीक्षेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना ११ आणि १२ नोव्हेंबरला दोन दिवस शाळेत यावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा हिरमोड होऊ शकतो. शैक्षणिक वर्ष सुरू होताना शालेय शिक्षण विभागाने दिवाळीच्या सुट्ट्या एक ते २० नोव्हेंबर या कालावधीत जाहीर केल्या होत्या. त्यानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांना दिल्या होत्या. मात्र, एनएएस १२ नोव्हेंबरला असल्याने, शालेय शिक्षण विभागाने २७ नोव्हेंबरला नवे परिपत्रक प्रसिद्ध केले. दिवाळीच्या सुट्ट्या २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत राहणार असल्याचे जाहीर केले. ऐन वेळी सुट्ट्यांचा निर्णय बदलल्याने, विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी नाराजी व्यक्त केली. या बदललेल्या निर्णयामुळे सुट्ट्यांचा कालावधी साधारण सहा दिवसांनी कमी झाला. त्यामुळे अनेकांचे सुट्ट्यांच्या काळातील नियोजन बिघडले. याबाबत शिक्षक संघटनांनी आपली नाराजी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे व्यक्त केली. या सर्वांचा विचार केल्यानंतर, दिवाळीच्या सुट्ट्या तीनपैकी कोणत्याही टप्प्यात घेण्याची मुभा शालेय शिक्षण विभागाने दिली आहे. याबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक दिनकर टेमकर यांनी सुट्ट्यांचे परिपत्रक प्रसिद्ध केले. त्यानुसार २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत आहे. सुट्ट्यांनंतर ११ नोव्हेंबरला शाळा सुरू झाल्यावर, १२ नोव्हेंबरला राज्यात एनएएस परीक्षा होईल. सुट्ट्या कमी झाल्या असल्या, तरी सरकारी नियमांप्रमाणे अनुज्ञेय असलेल्या सुट्ट्या एनएएस परीक्षा झाल्यावर, नाताळच्या काळात किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत स्थानिक स्तरावर निर्णय घेऊन समायोजित कराव्यात. हा निर्णय सर्व शाळांना लागू राहणार आहे, अशा सूचना टेमकर यांनी शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी यांना परिपत्रकाद्वारे दिल्या. शाळांना कमी झालेल्या सुट्ट्या एनएएस परीक्षा झाल्यावर, नाताळच्या काळात किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत घेता येईल. याबाबतचे नियोजन शाळांना स्थानिक स्तरावर करावे लागणार आहे. सरकारी नियमाप्रमाणे देय असणाऱ्या सुट्ट्यांची संख्या लक्षात घेऊन शाळांनी नियोजन करावे असे प्राथमिक शिक्षण संचालनालय संचालक दिनकर टेमकर यांनी सांगितले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kaBoVl
via nmkadda