Advertisement
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई गेल्या दीड वर्षापासून बंद असलेल्या शाळांतील सर्वच इयत्तांचे वर्ग सुरू करून प्रत्यक्ष शिक्षणसंधी उपलब्ध करून द्यावी, या मागणीचा रेटा वाढू लागला आहे. दिवाळीनंतर दुसऱ्या सत्राची सुरुवात होत असताना प्रत्यक्ष वर्ग () भरावेत, यासाठी पालक आणि शिक्षणतज्ज्ञ आग्रही आहेत. मात्र, स्थानिक प्रशासन या निर्णयासाठी टास्क फोर्सकडे बोट दाखवित आहे, तर शिक्षण विभागाचे लक्ष मुख्यमंत्री कार्यालयाच्या निर्णयाकडे आहे. करोना संकटामुळे मार्च २०२०मध्ये बंद झालेल्या शाळा दुसरी लाट ओसरल्यानंतर टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आल्या. राज्यात चार ऑक्टोबरपासून शहरी भागात इयत्ता आठवी ते बारावी, तर ग्रामीण भागात इयत्ता पाचवी ते बारावीचे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यात आले आहेत. आता इयत्ता पहिली ते चौथीचेही वर्ग सुरू करण्यात यावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. याचबरोबर पूर्व प्राथमिकच्या वर्गांतील विद्यार्थ्यांनाही शाळेत हजेरी लावण्याची संधी मिळाल्यास हे विद्यार्थी प्रथमच शाळेत पाऊल ठेवतील, अशी भावनाही समाजातील विविध स्तरांतून व्यक्त होत आहे. आजवर शाळाच न बघितलेल्या मुलांसाठी, तसेच ऑनलाइन शिक्षणात गुंतून पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष वर्ग सुरू होणे महत्त्वाचे आहे, असे मत व्यक्त होत आहे. राज्यात सध्या ग्रामीण भागात पाचवी ते बारावीचे, तर शहरी भागात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष भरत आहेत. हे वर्ग दिवाळीनंतर आज, सोमवारपासून पुन्हा सुरू होतील. दिवाळीनंतर खरे तर राज्यभरात इयत्ता पहिली ते चौथीचेही वर्ग सुरू होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात शालेय शिक्षण विभागाकडून कोणतेही आदेश न आल्याने शिक्षणक्षेत्रात नाराजीचे वातावरण आहे. याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांकडे विचारणा केली असता टास्क फोर्सच्या सूचनेनंतर सरकारने काही आदेश दिल्यासच पुढचे पाऊल उचलले जाईल, असे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्री कार्यालयाकडे बोट दाखविले आहे. नगर जिल्हा परिषदेने इयत्ता पहिलीपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हिवरे बाजार, कराड शाळा क्र. ३ या शाळा यापूर्वीपासूनच इयत्ता पहिलीपासून सुरू आहेत. या शाळांमध्ये सुरक्षा नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षण दिले जात आहे. तेथे अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही, असे शिक्षणतज्ज्ञ सांगतात. विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने सर्व इयत्तांचे वर्ग सुरू होणे आवश्यक विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज लक्षात घेऊन काही स्थानिक प्रशासनाने पुढाकार घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. ही त्यांची भूमिका विद्यार्थीहिताची असली, तरी सरकारी पातळीवर राज्यभरात एकसमान निर्णय लागू करण्यासाठी फारशी उत्सुकता दिसून येत नाही. याचा अर्थ आपले राज्यकर्ते संवेदनशीलता हरवून बसले आहेत, असा घ्यावा का? विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने आता सर्व इयत्तांचे वर्ग सुरू होणे आवश्यक आहे. - डॉ. वसंत काळपांडे, राज्याचे माजी शिक्षण संचालक शारीरिक कौशल्याची उणीव गेल्या दीड-दोन वर्षांच्या काळात लहान मुलांना बाहेर पडता येत नसल्याने त्यांच्या शारीरिक कौशल्यांच्या विकासावर मार्यादा आल्या आहेत. हा मुद्दा फारसा कोणीही गांभीर्याने घेत नसल्याची खंत मेंदू अभ्यासतज्ज्ञ डॉ. श्रुती पानसे यांनी व्यक्त केली. आठ वर्षांपर्यंत मुलांमध्ये शारीरिक कौशल्ये विकसित होणे आवश्यक असते. त्यांच्यातील ऊर्जा खेळण्यातून, त्यांच्या शारीरिक हालचालीतून योग्य ठिकाणी खर्ची होत असते. यामुळे पूर्व प्राथमिकपासून सर्व शाळा सुरू होणे आवश्यक असल्याचेही डॉ. पानसे म्हणाल्या.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/30KCG2v
via nmkadda