Advertisement
म. टा. प्रतिनिधी, पुणे एसटी संपामुळे शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (टीईटी) पुणे, कोल्हापूर, नाशिक, नांदेडसह काही शहरांमध्ये उमेदवार परीक्षा केंद्रावर उशिरा पोहोचल्याने, त्यांना परीक्षा देता आलेली नाही. दरम्यान, पुण्यासह राज्यात परीक्षा सुरळीत पार पडल्याचा दावा परिषदेकडून करण्यात आला. या परीक्षेच्या पहिल्या पेपरला ८८ ते ९२ टक्के, तर दुसऱ्या पेपरला ९० टक्क्यांहून अधिक उमेदवारांनी उपस्थिती लावली. करोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांनंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये टीईटी परीक्षा घेण्यात आली. टीईटीच्या पेपर एकसाठी दोन लाख ५४ हजार ४२८, पेपर दोनसाठी दोन लाख १४ हजार २५० उमेदवारांनी नोंदणी केली होती. यातील साधारण ९० टक्के उमेदवारांची टीईटी परीक्षेला उपस्थिती होती. पेपरला उशीर झाल्याने परीक्षा देण्यास परवानगी न दिल्याने कोल्हापूर, नाशिक, नांदेड शहरांमध्ये 'टीईटी' परीक्षेवेळी विविध केंद्रावर मोठा गोंधळ झाला. अनेक ठिकाणी परीक्षार्थी व केंद्रप्रमुख यांच्यात वादावादी झाली. पोलीस बंदोबस्तात ही परीक्षा घ्यावी लागली.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3cFs736
via nmkadda