Advertisement

म. टा. प्रतिनिधी, हडपसर एसटी संपामुळे परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास अवघ्या दोन ते पाच मिनिटांचा उशीर झाल्यामुळे साधारण ४० विद्यार्थ्यांना स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षेला बसू न देण्याचा प्रकार रामटेकडी परिसरात सोमवारी घडला. परीक्षेला बसू देत नसल्याने विद्यार्थी आणि परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाल्यावर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. गेल्या दोन ते तीन वर्षापासून स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षेची प्रतीक्षा केल्यानंतर परीक्षा न देता आल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. रामटेकडी परीक्षा केंद्रावर स्टाफ सिलेक्शन कॉन्स्टेबल पदासाठी परीक्षा होती. या परीक्षेला राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून विद्यार्थी आले होते. परीक्षेसाठी सकाळी साठेआठ वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर येणाऱ्या उमेदवारांना प्रवेश देण्याचा नियम होता. राज्यात एसटीचा संप सुरू असल्यामुळे साधारण ४० ते ५० विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास दोन ते पाच मिनिटांचा उशिर झाल्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी उमेदवारांना केंद्रात येऊ दिले नाही. यातील काही विद्यार्थी रामटेकडीचे रेल्वेगेट बंद झाल्यामुळे परीक्षा केंद्रावर वेळेत पोहचू शकले नाहीत. एसटी उपलब्ध न झाल्याने अक्कलकोटवरून ट्रकने प्रवास करीत आलो. मात्र, काही मिनिटे उशिर झाल्याने परीक्षा देता आली नाही, अशी प्रतिक्रिया एका उमेदवाराने दिली. प्रशासनामुळे मनस्ताप अनेक उमेदवारांना एसटी संपामुळे परीक्षा देण्यापासून वंचित राहिल्याचे उमेदवारांनी सांगितले. या वेळी परीक्षेची संधी गमवावी लागल्यामुळे उमेदवारांनी आपला मनस्ताप व्यक्त करून प्रशासनाला जबाबदार धरले. केंद्रांवर उमेदवार आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला. त्यामुळे वानवडी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. शिवसेना युवक आघाडीचे शादाब मुलानी व राष्ट्रवादी युवक आघाडीच्या अजित घुले यांनी घटनास्थळी येऊन प्रशासनला विचारणा केली. या प्रकाराबाबत वानवडी पोलीस ठाणे व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे मुलाणी यांनी सांगितले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xioObY
via nmkadda