Advertisement
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पदवी परीक्षेतील विद्यार्थ्यांना विद्यापीठाने संबंधित विषयाच्या उत्तरपत्रिकांच्या छायांकीत प्रती देण्याची प्रक्रिया सुरू केली. विद्यार्थ्यांना १६ नोव्हेंबरपर्यंत महाविद्यालयात अर्ज करावा लागणार आहे. विद्यार्थ्यांना दोनच विषयाच्या उत्तरपत्रिकेची मागणी करता येईल व प्रती विषय शंभर रुपये शुल्क आकारले जाणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले. विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याच्या तक्रारी केल्या आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने ही प्रक्रिया सुरू केली आहे. विद्यापीठातर्फे मार्च-एप्रिल २०२१मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यानंतर विद्यार्थ्यांकडून अनेक तक्रारी समोर आल्या. अनेक विद्यार्थी उपस्थित असून गैरहजर, कमी गुण अशा तक्रारी आहेत. त्यानंतर प्रशासनाने विविध पातळीवर प्रक्रिया सुरू केली. त्यात कमी गुण मिळाल्याच्या तक्रारी होत्या. अशा विद्यार्थ्यांना विद्यापीठाने उत्तरपत्रिकांची छायांकीत प्रत देण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांनी सोडवलेली ऑनलाइन उत्तरपत्रिकाच त्याच्या हाती दिली जाणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया कशी असेल याबाबत विद्यापीठाने स्पष्ट केले. निकालात त्रुटी जाणवत आहेत अशा विद्यार्थ्यांना अर्ज सादर करावे लागणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये हा अर्ज सादर करण्याची मुदत १६ नोव्हेंबरपर्यंत देण्यात आली आहे. महाविद्यालयांकडून हे अर्ज १८नोव्हेंबरपर्यंत विद्यापीठातील परीक्षा विभागाकडे जमा केले जातील. त्यानंतर विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची छायांकीत प्रत दिली जाणार असल्याचे म्हटले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला दोन विषयांसाठी अर्ज सादर करता येणार आहे. प्रत्येक विषयाला शंभर रुपये शुल्क विद्यापीठ आकारणार आहे. अर्जाबाबत प्रशासनाच्या सूचना विद्यार्थ्यांकडून मागविण्यात आलेल्या अर्जावर विद्यार्थ्याला त्याचे नाव, बैठक क्रमांक व पीआरएन क्रमांक, परीक्षेचे नाव, पेपरचे नाव व कोड नंबर,पेपरचा दिनांक, महाविद्यालयाचे नाव याबाबी नोंदवायच्या आहेत. ही माहिती अचूक भरून अर्ज महाविद्यालयात सादर करावयाचा असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने म्हटले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2YyDM0v
via nmkadda