Advertisement
![](https://maharashtratimes.com/photo/88727110/photo-88727110.jpg)
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता अकरावीसाठी घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा गतवर्षी रद्द करण्यात आली होती. यामुळे या परीक्षेसाठी घेण्यात आलेले शुल्क विद्यार्थ्यांना परत करण्यात येणार आहे. ज्या पेमेंट गेटवेद्वारे शुल्क भरण्यात आले, त्याचमार्फत विद्यार्थ्यांना १४३ रुपये परत केले जाणार असल्याचे राज्य मंडळाने म्हटले आहे. गतवर्षी दहावीचा निकाल मूल्यमापनावर आधारित जाहीर झाल्याने अकरावी प्रवेशासाठी परीक्षा घेतली जाणार होती. या सीईटीसाठी राज्यभरातून १० लाख ९८ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. सीबीएसई, सीआयएससीई व आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या ४४ हजार विद्यार्थ्यांचाही यामध्ये समावेश होता. मुंबई उच्च न्यायालयाने सीईटी रद्द करण्याचे निर्देश राज्य शासनाला दिले होते. त्यानुसार परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. 'सीईटी'साठी राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेण्यात आले नव्हते. मात्र सीबीएसई, सीआयएससीई व आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १७८ रुपये शुल्क घेण्यात आले होते. मात्र परीक्षाच रद्द झाल्याने परीक्षा शुल्क परत मिळावे, अशी मागणी विद्यार्थी, पालक व संघटनांनी केली होती. यानुसार हे शुल्क त्यांना लवकरच परत करण्यात येणार आहे. राज्य मंडळाच्या वेबसाइटवर २०५२ आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक या वेबसाइटवर ४१,५८२ विद्यार्थ्यांनी ज्या पेमेंट गेटवेद्वारे व ज्या माध्यमातून परीक्षा शुल्क जमा केले आहे, त्याच मार्गाने प्रति विद्यार्थी १४३ रुपयांप्रमाणे परीक्षा शुल्काचा परतावा करण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला असल्याची माहिती राज्य मंडळाचे सचिव अशोक भोसले यांनी दिली.
source https://maharashtratimes.com/career/career-news/maharashtra-board-to-refund-fyjc-online-entrance-exam-fees-2021/articleshow/88727110.cms