Advertisement

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद बारावीची मंडपात परीक्षा (HSC Exam 2022) घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर दहावी परीक्षेसाठी (SSC Exam 2022) शिक्षण विभाग खबरदारी म्हणून परीक्षा केंद्रांचा आढावा घेत आहे, भौतिक सुविधा, प्रशस्त इमारत, स्वच्छतागृह, पंखे-दिवे या बाबींची पूर्तता करून घेण्याबाबत लेखी कळवा, केंद्रप्रमुखांनी समक्ष पाहणी करून मुख्यापकांना सुचित करावे असे निर्देश शिक्षणाधिकारी कार्यालयाने गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुखांना दिले. जिल्ह्यात २२४ मुख्य केंद्र तर ६२१ उपकेंद्राहून ६५ हजार दहावीचे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची परीक्षा ४ मार्चपासून सुरू झाली. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी भौतिक सुविधांबाबत काही संस्थांकडून दिलेले हमीपत्र धुळफेक करणारे असल्याचे समोर आले. औरंगाबादपासून जवळच असलेल्या नीलजगाव परीक्षा केंद्रावर चक्क मंडपात बारावीचा इंग्रजी विषयाचा पेपर घेण्यात आला. उन्हाच्या तीव्र झळा सहन करून विद्यार्थ्यांनी इंग्रजीचा पेपर सोडवला. 'महाराष्ट्र टाइम्स'ने परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या व्यथा मांडल्या. त्यानंतर शिक्षण मंडळ, शिक्षणाधिकारी कार्यालयाने संबंधित संस्थेवर तातडीने कारवाई केली. भौतिक सुविधाबाबत या विद्यालयाने हमीपत्र दिले. त्यात सुविधांबाबत स्पष्ट करण्यात आले. खोटी माहिती दिल्याच्या कारणावरून प्रशासनाने कारवाई केली. या प्रकारानंतर आता दहावी परीक्षेत परीक्षा केंद्रावरील भौतिक सुविधांबाबत प्रशासन खडबडून जागे झाले आहे. शिक्षणाधिकारी कार्यालयाने गटशिक्षणाधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेत या प्रकरणी सर्व केंद्र प्रमुखांना तातडीने सूचना देण्याबाबत निर्देश दिले. दहावीची परीक्षा १५ मार्चपासून सुरू होत आहे. जिल्ह्यात ६५ हजार विद्यार्थी विविध ८४५ परीक्षा केंद्राहून परीक्षा देणार आहेत. 'शाळा तिथे केंद्र' असणार आहे. त्यामुळे आपल्या शाळेतीलच विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याएवढ्या भौतिक सुविधा अनेक शाळांकडे नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे केंद्रप्रमुखांना पुन्हा तातडीने मुख्याध्यापकांना भौतिक सुविधांबाबत निर्देश देण्याच्या, समक्ष पाहणी करून अहवाल देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्रप्रमुखांना अशा आहेत सूचना बारावीचा पहिला इंग्रजीच्या पेपरची पैठण तालुक्यातील बातम्या अनुषंगाने आपल्या तालुक्यातील सर्व इयत्ता बारावी सेंटर तसेच पुढे होणाऱ्या इयत्ता दहावी परीक्षा केंद्राबाबत मुख्याध्यापकांना परीक्षकामी लागणाऱ्या सर्व भौतिक सुविधा प्रशस्त इमारत स्वच्छतागृह पंखे लाईट या बाबींची पूर्तता करून घेण्याबाबत तात्काळ लेखी कळवावे व त्याची पोहोच आपल्या दप्तरी जतन करून ठेवावे जेणेकरून पुढे काही अडचण आल्यास अहवाल आपल्या दप्तरी जमा राहील याची गांभीर्याने नोंद घ्यावी. कोणत्याही केंद्रात इयत्ता बारावी तसेच पुढे होणाऱ्या दहावी मध्ये त्रुटी राहणार नाही, याची केंद्रप्रमुखांनी समक्ष पाहणी करून मुख्याध्यापकांना सूचित करावे तसेच काही अडचण असल्यास लेखी अहवाल कार्यालयास कळवावा, असे म्हटले असल्याचे सूत्रांनी सांगितले. विभागात दहावीची परीक्षा केंद्रे जिल्हा मुख्य केंद्रे उपकेंद्रे औरंगाबाद २२४ ६२१ बीड १५६ ४७५ जालना १०० २७३ परभणी ९३ ३०४ हिंगोली ५३ १४९ एकूण विद्यार्थी .. १,८४,३२९ मुख्य परीक्षा केंद्र ६२६ उपकेंद्रांची संख्या १८२२
source https://maharashtratimes.com/career/career-news/hsc-ssc-exam-2022-students-in-few-centers-at-aurangabad-with-lack-of-facilities/articleshow/90044449.cms