Advertisement

डॉ. ज्योत्स्ना डोंगरदिवे, डॉ. अंबुजा साळगावकर, डॉ. आर. श्रीवरामंगई कम्प्युटर सायन्स विभाग मुंबई विद्यापीठाचा १९७८ ला स्थापन झालेला कम्प्युटर सायन्स (संगणकशास्त्र) विभाग हा देशातील संगणकशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षणाची मुहूर्तमेढ म्हणता येईल. आज देशातील पहिला कॉम्प्युटर सायन्स आणि डेटा सायन्समधील पदव्युत्तर अभ्यासक्रम ब्लेंडेड मोडमध्ये राबवणारा अशी स्वत:ची ओळख या विभागाने निर्माण केलेली आहे. अभ्यासक्रमांत मूकचा अंतर्भाव करणारा तसेच कम्प्युटर असिस्टेड म्युझिक लर्निंग हा अत्यंत नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम राबवणारा हा भारतातील पहिला विभाग. जगातील पहिल्या मूकमध्ये १०० पैकी १०० गुण मिळवणारी निशा यादव ही याच विभागातील पीएचडीची संशोधन विद्यार्थिनी होय. येथील विद्यार्थी विद्यापीठातील आयआयटी, बीएआरसी, टीआयएफआर या संशोधन संस्थांतून तसेच विद्यापीठाच्या अनेक विभागात आंतरवासिता (इंटर्नशिप) करीत आला आहे. २०१८-१९ मध्ये राबवलेला पायथन विथ डेटा सायन्स हा देश परदेशातील दोन हजार विद्यार्थ्यांचा सहभाग असलेला मोफत ऑनलाइन कोर्स हे विभागाच्या इंडस्ट्रीयल पार्टनरशिपचे द्योतक आहेत. भारतीय आणि परदेशी विद्यापीठांतील विद्यार्थ्यांना आंतरवासितेसाठी प्रोत्साहन, विद्यार्थी-शिक्षक यांचे एकत्रित संशोधन हे या विभागाचे वैशिष्ट्य आहे. कम्प्युटेशनल मॅन्युस्क्रिप्टॉलॉजी, इंडस स्क्रिप्ट, प्राचीन भारतीय गणन आणि संदेशवहन, आधुनिक संदेशजाल, कम्प्युटर आणि त्यांची सुरक्षा, शैक्षणिक तंत्रज्ञान, अंध, मूक-बधिर तसेच डिसकॅल्क्युलिया असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष शैक्षणिक तंत्रज्ञान, प्रादेशिक भाषेत तंत्रज्ञान, रोबोटिक्स, शाश्वत शेतीसाठी तंत्रज्ञान, वाहतूक व्यवस्थापन, कर्जधारणा, जिओ-स्पेसिफिक माहितीचे विश्लेषण, प्रोटीनसाखळीचे विश्लेषण यांसाठी तंत्रज्ञान, कम्प्युटरद्वारा प्रश्नपत्रिकेचे, पाककृतींचे तसेच कवितांचे निर्माण, एचआयव्ही/एड्स, डेंटल इम्प्लांट रेडिओलॉजी, न्यूरोडिजनरेटिव्ह डिसॉर्ड्स या समस्यांवरील उपचार तसेच क्लिनिकल डेटा आणि मेडिकल इमेजेस यांचे विश्लेषण यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग अशा विविध क्षेत्रांतील संशोधन विभागात होत असते. सध्या विभागात एमएस्सी कम्प्युटर सायन्स (जनरल आणि डेटा सायन्स स्पेशलायझेशन असे दोन अभ्यासक्रम), एमफिल आणि पीएचडी तसेच डेटा सायन्समधील पदविका हे अभ्यासक्रम राबवले जातात. संगणकशास्त्रातील पारंपारिक आणि आधुनिक यांचा उचित संयोग असलेले शिक्षण, स्पेशलायझेशन, इंडस्ट्रियल इंटर्नशीप, फॉस, डेटा अॅनेलिटिक्स आणि मशिन लर्निंग या विषयांचा अंतर्भाव असलेला अभ्यासक्रम हे अनोखे वैशिष्ट्य लाभलेला हा विभाग आहे. माहिती-तंत्रज्ञान विभाग (आयटी) २००१ला स्थापन झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागात तीन वर्षांचा बीएस्सी आयटी आणि दोन वर्षाचा एमएस्सी आयटी हा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू झाला. या विभागातील विद्यार्थ्यांनी माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. पीएचडीचा अभ्यासक्रम आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचे पदव्युत्तर अभ्यासक्रम या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात येत आहेत. तर सायबर सुरक्षा कायद्यातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम आणि कायदा अंमलबजावणी संस्थासाठी एक्झिक्युटीव्ह डेव्हलपमेंट प्रोग्राम या विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम राष्ट्रीय पातळीवर प्रवेश परीक्षा घेऊन सुरू करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक लेखा परीक्षण प्रकल्प विकसित करण्याची जबाबदारी विभागाकडे देण्यात आली होती. त्यांनी हे प्रारुप आययुएमएस प्रणालीमध्ये महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांसाठी महाराष्ट्र शासनाचे ईआरपी सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले. महाराष्ट्र सायबर सेलमध्ये काही विद्यार्थ्यांना आंतरवासिता मिळाली. माहिती तंत्रज्ञान विभागाने संशोधनासाठी डिजिटल इमेज प्रोसेसिंग, डेटा सायन्स, कृत्रिम बुद्धीमत्ता, सायबर सुरक्षा आणि क्लाऊड कम्प्युटिंग या विषयांची निवड केली आहे. या विभागाने कम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया, ब्रिटीश काऊन्सिल लायब्ररी, आयईईई व आयआयआयईसारख्या संस्थांत विद्यार्थ्यांच्या हितासाठी संस्थात्मक सदस्यताही घेतली आहे. त्याचबरोबर ईसी काऊन्सिलसाठी शैक्षणिक भागीदारी घेतली आहे. मुंबई विद्यापीठातील युजीसी-एचआरडीसी या विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या रिफ्रेशर कोर्सचे आयोजन या विभागामार्फत नियमितपणे करण्यात येते. तसेच विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व समाजास प्रबोधन करण्याच्या दृष्टिने सायबर गुन्हेगारी जागरूकता अभियानही या विभागामार्फत केले जाते. (लेखिका अनुक्रमे संगणकशास्त्र विभाग आणि माहिती तंत्रज्ञान विभागातील प्राध्यापक आहेत.)
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ALZdt2
via nmkadda