Advertisement
म.टा. प्रतिनिधी, नागपूर बारावी शालांत परीक्षेच्या मूल्यांकन आणि गुणदानाचे नागपूर विभागातील काम संपले असून आता सर्वांचे लक्ष निकालाकडे ( 2021) लागले आहे. ३१ जुलैपर्यंत हा निकाल जाहीर होण्याची अपेक्षा असून दहावीप्रमाणेच बारावीचा निकालही भरघोस लागणार असल्याची शक्यता आहे. बारावीला असणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुण संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठी २३ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर, याकरिता एक दिवसाची मुदतवाढही देण्यात आली. या कालावधीत बहुतांश नियमित विद्यार्थ्यांचे गुण संकेतस्थळावर अपलोड झालेले आहेत. सुरुवातीला आलेल्या काही अडचणींनंतर बहुतांश ज्युनियर कॉलेजेसनी विद्यार्थ्यांचे गुण महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडे सादर केले आहेत. मागील वर्षी अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणांसंदर्भातील काही अडचणी वगळल्यास बहुतांश विद्यार्थ्यांचे गुण आता अपलोड करण्यात आले आहेत. बारावीतील विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करताना दहावी, अकरावी आणि बारावी अशा तीन वर्गांचे गुण विचारात घेण्यात आले आले. दहावी आणि अकरावीच्या लेखी परीक्षांचे प्रत्येकी ३० टक्के, तर बारावीचे ४० टक्के गुण गृहित धरण्यात आले आहेत. याशिवाय, बारावीचे अंतिम तोंडी परीक्षेचे गुणही विचारात घेतले गेले आहेत. या सगळ्या गुणांची बेरीज करून विद्यार्थ्यांचा निकाल लावला जाणार आहे. या सूत्रामुळे, जेमतेम उत्तीर्ण होऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांनादेखील ७० टक्क्यांच्या आसपास गुण मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे, एकंदर निकालाचे आणि विद्यार्थ्यांच्या टक्केवारीचे प्रमाण जास्त राहण्याची शक्यता आहे. दहावीप्रमाणेच बारावीच्याही निकालाच्या टक्केवारीत भरभक्कम वाढ होणार असल्याचे संकेत आहेत. दरम्यान, निकालाच्या या सुत्रामुळे हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची खंत बहुतांश ज्युनियर कॉलेजांनी व्यक्त केली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Tz8jbR
via nmkadda