Advertisement
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (ITI) सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेत दोन फेरी पूर्ण झाल्या असून यामध्ये राज्यस्तरावर ३६.९० तर, विभागीय पातळीवर ३४.५४ टक्केच प्रवेश पूर्ण झाले आहे. राज्यात एक लाख ३२ हजार ९९० पैकी ४९ हजार ६९ तर औरंगाबाद विभागात १९ हजार ६४६ पैकी ६ हजार ७८६ जागांवर प्रवेश पूर्ण झाले आहेत. अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक असतो, परंतु यंदा प्रक्रिया वेळेत सुरू होऊनही प्रवेशाची टक्केवारी कमी आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा परिणाम औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रक्रियेवरही झाला. कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने ही प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. केंद्रीय प्रवेशाच्या दोन फेऱ्यांमध्ये राज्यातील १ लाख ३२ हजार ९९० जागांपैकी ४९ हजार ६९ प्रवेश झाले असून ३६.९० टक्के जागा भरल्या गेल्या आहेत. तर औरंगाबाद विभागात आयटीआयचे ३४.५४ टक्के प्रवेश झाले आहेत. केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अद्याप दोन फेरी होणार आहेत. औरंगाबाद विभागातील शासकीय ८२ आणि खासगी ५७ आयटीआय मिळून अशा एकूण १३७ आयटीआयमध्ये १९ हजार ६४६ जागा भरल्या जाणार आहेत. सध्या आयटीआयच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्या असून विभागात फेऱ्यांमध्ये सहा हजार ७८६ जागा भरल्या गेल्या आहेत. राज्यात सहा विभागात दोन फेरींमध्ये सर्वाधिक प्रवेश मुंबई विभागात ४४.०९ टक्के झाले आहेत. अमरावती विभागात ३८.५५ टक्के, नागपूर ३०.६२ टक्के, नाशिक ३७.५० व पुणे ३७.७३ टक्के जागांवर प्रवेश पूर्ण झाले आहेत. आयटीआय प्रवेशाच्या यंदाही चार फेरी होणार असून यानंतर समुपदेशन फेरीही असणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3i5r8wy
via nmkadda