Advertisement
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई राज्य सरकारने आठवी ते बारावीपर्यंत शाळा सुरू करण्याची परवानगी दिल्याने नवी मुंबई महापालिका हद्दीत शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र दीड वर्षांनी शाळा सुरू झाल्याने शाळा-कॉलेजांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तक्रारीही वाढल्या आहेत. विद्यार्थ्यांची दुखणी, आजार वाढले असून सुरुवातीला शाळेत गेलेले अनेक विद्यार्थी आजारी पडल्याने काही शाळांमध्ये सुरू करण्यात आलेले काही वर्ग बंदही करावे लागले आहेत. इतक्या दिवसांनी शाळेत जावे लागत असल्याने मुलांची शाळेत जाण्याची मानसिकता अजून तयार झाली नसल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. इतक्या दिवसांनी शाळा सुरू झाल्याने मुलांमध्ये शाळेत जाण्याचा उत्साह असला तरी शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्यानंतर प्रत्यक्षात एकाच जागी बसून अभ्यास करण्याची मुलांची सवय निघून गेली आहे. इतके दिवस घरात बसून शिकल्यानंतर आत्ता थेट बाहेर जाऊन, प्रवास करून शाळेत अभ्यास करण्याची अनेक विद्यार्थ्यांची मानसिकता राहिलेली नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी आजारी पडू लागले आहेत. काही विद्यार्थ्यांना सांधेदुखी, काहींना वायरल फिवर, अशक्तपणा असा त्रास जाणवू लागला आहे. त्यामुळे पाहिल्याच दिवशी वर्गात हजेरी लावलेले अनेक विद्यार्थी आत्ता वर्गात गैरह जर आहेत. 'ऑफलाइन'ऐवजी ऑनलाइन अभ्यास करू, असे अनेक विद्यार्थी म्हणू लागले आहेत. त्यामुळे खासगी कॉलेजात बारावीचे काही वर्ग पुन्हा ऑनलाइन सुरू झाले आहेत. याबाबत संबंधित एका कॉलेजने पालकांचे मत जाणून घेतले असता, अनेक पालकांनी ऑनलाइन वर्गांना पसंती दाखवली आहे. त्यामुळे काही वर्ग पुन्हा 'ऑनलाइन' झाले आहेत. यामध्ये विज्ञान शाखेच्या वर्गांचा अधिक समावेश आहे. बहुतांशी मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये, महापालिकेच्या शाळांमध्ये, आठवी ते दहावीच्या वर्गातील विद्यार्थीसंख्या सुरुवातीपासून अगदी जितकी होती तितकीच आत्ता आहे, अशी माहिती महापालिका शिक्षण विभागाचे उपायुक्त जयदीप पवार यांनी दिली आहे. खासगी कॉलेजे आमच्या अखत्यारित नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र शाळेत मुलांना पाठवायचे की नाही, याबाबत निर्णय पालकच घेऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. 'आमच्या शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या नियमित आहे. काही विद्यार्थी आजारी पडत आहेत. मात्र त्यांना वायरल फिव्हर, अंगदुखी यांसारखे त्रास जाणवत आहेत. मात्र आम्ही त्यांना मार्गदर्शन करत आहोत. विद्यार्थी आजारी असेल तर त्याला सुट्टी देत आहोत आणि ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध करून देत आहोत. आम्हाला पालक आणि विद्यार्थ्यांचेही समुपदेशन करावे लागत आहे. इतक्या दिवसांनी शाळेत जाताना मुलांच्या मानसिक आरोग्याचाही विचार करायला हवा. मात्र मुले मिळणाऱ्या या सुविधेचा गैरवापर करत नाही ना, याचीही काळजी आम्हाला घ्यावी लागत आहे,' असे ज्ञानविकास शाळेच्या दहावीच्या शिक्षिका सुचिता भोईर यांनी सांगितले. असे असले तरी काही ठिकाणी विद्यार्थ्यांची उपस्थिती सुरुवातीला होती तितकीच आहे. काही विद्यार्थी गावी गेले आहेत, ते दिवाळीनंतर परत येणार आहेत. त्यामुळे दिवाळीनंतर विद्यार्थ्यांची संख्या वाढणार असल्याचा विश्वास अनेक शाळांना आहे. आम्ही आमच्या कॉलेजमध्ये अकरावीचे वर्ग सुरू केले आहेत. मात्र विज्ञान शाखांचे प्रॅक्टिकल कॉलेजमध्ये आणि थिअरी ऑनलाइन घेत आहोत. प्रवासात अडचण असलेल्या आणि आजारी मुलांना अभ्यासाची स्वतंत्र लिंक पाठवून देत आहोत. यामुळे काम वाढले आहे, मात्र विद्यार्थ्यांना शिकवण्याचा आनंद आहे. - प्रा. रवींद्र पाटील, रा. फ. नाईक कॉलेज, कोपरखैरणे
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3iX3Ycc
via nmkadda