Advertisement
म. टा. प्रतिनिधी, पुणे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता आणि बारावी पुरवणी परीक्षेचा ऑनलाइन निकाल आज, बुधवारी (२० ऑक्टोबर) दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे. मंडळाच्या वेबसाइटवरून विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण उपलब्ध होणार असून, निकालाची प्रतही घेता येईल. मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत पुरवणी परीक्षा घेण्यात आली होती. अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे केलेले गुणांकन न पटलेल्या, तसेच गुणांमध्ये सुधारणा करू इच्छिणाऱ्या, दहावी, बारावीत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून दहावी व बारावी पुरवणी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास गुणांची पडताळणी करण्यासाठी गुणपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी अर्ज करता येणार आहे. ज्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातून विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे, त्यामार्फत हे अर्ज ऑनलाइन पद्धतीने करता येतील, असे राज्य माध्यमिक मंडळाने स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी २१ ते ३० ऑक्टोबरपर्यंत व छायाप्रतींसाठी २१ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील. या प्रक्रिया पार पाडल्यानंतरच विद्यार्थ्यांना पूनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येणार आहेत. अर्जप्रक्रियेला सुरुवात पुढीलवर्षी होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांना प्रविष्ट व्हायचे आहे, अशा पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. याशिवाय नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत प्रविष्ट होणारे व आयटीआय अभ्यासक्रमातून ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्जही ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3n7veG5
via nmkadda