Advertisement
म. टा. प्रतिनिधी, नाशिक तीन वेळेस नियोजन बदलल्यानंतर अखेरीस २१ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेची (टीईटी) परीक्षा केंद्रे निश्चित झाली आहेत. राज्य शिक्षण परिषदेने परीक्षार्थींना प्रवेशपत्रेही उपलब्ध करून दिली आहेत. दोन पेपरसाठी स्वतंत्र प्रवेशपत्रे देण्यात आली असून, त्यामुळे दोन्ही पेपरसाठी बैठक क्रमांक वेगळे राहणार आहेत. दोन दिवसांपूर्वी लिंक ओपन होत नसल्याने प्रवेशपत्र डाउनलोड होत नव्हते. परंतु, आता हा तिढा सुटला आहे. मात्र, दोन प्रवेशपत्रे असल्याने परीक्षार्थींनी त्यानुसार योग्य नियोजन करीत दोन्ही प्रवेशपत्रे सोबत बाळगणे अनिवार्य असणार आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचे (टीईटी) नियोजन अंतिम टप्प्यात असल्याचे समजते. दीड वर्षानंतर टीईटी होत असल्याने परिषदेच्या नियोजनानुसार मुदतीत परीक्षा घेतली जाण्याची अपेक्षा आहे. मात्र, परीक्षेच्या घोषणेपासून सातत्याने नियोजनात बदल होत आहेत. आता २१ नोव्हेंबरचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. त्यासाठीची प्रवेशपत्रेदेखील परीक्षार्थींच्या लॉगिनमध्ये देण्यात आले आहेत. करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे निर्देश आहेत. कोणत्याही कारणास्तव प्रश्न रद्द करावा लागल्यास उर्वरित प्रश्नांच्या गुणांवर आधारित पात्रता निश्चित केली जाईल. परीक्षेच्या दिवशी केंद्रात प्रवेश केल्यावर परीक्षा संपेपर्यंत परीक्षार्थींना बाहेर जाता येणार नाही. प्रश्नपत्रिकेवर कोणतीही खूण केल्यास गैरप्रकार समजण्यात येईल. दोन्ही प्रवेशपत्रे सादर करताना निर्धारित शासकीय ओळखपत्र दाखवावे लागेल. परीक्षा केंद्राची प्रत्यक्ष खात्री परीक्षेपूर्वीच करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...असे आहे नियोजन प्रवेशपत्रे : २१ नोव्हेंबरपर्यंत (ई-स्वरूपात) पेपर- १ : सकाळी १०.३० ते दुपारी १.३० पेपर- २ : दुपारी २ ते दुपारी ४.३० पेपर दोन उत्तीर्ण होणे अनिवार्य शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये सहावी ते आठवीच्या गटातील उच्च प्राथमिक शिक्षकांना नियुक्तीसाठी पेपर-२ उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. संबंधित उमेदवाराने प्राप्त केलेल्या पदवीच्या विषयानुसार हा पेपर राहील. जसे विज्ञान-गणित, सामाजिकशास्त्र या विषयांसाठी त्याच विषयाचा पेपर-२ घेण्यात येईल, तर इतर विषयांसाठी गणित, विज्ञान आणि सामाजिकशास्त्र यापैकी कोणत्याही एका विषयातील पेपर-२ उत्तीर्ण असणे आवश्यक असेल. त्यानुसार उमेदवारांनी अर्ज नोंदविण्याचे सूचित केले आहे. परीक्षेचे स्वरूप अन् गुण 'टीईटी' परीक्षेत बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, मराठी, इंग्रजी व्याकरण, गणित, परिसर अभ्यास या सर्व विषयांसाठी प्रत्येकी ३० गुणांचे प्रश्न विचारण्यात येतील. बालकांच्या मानसशास्त्रावर आधारित प्रश्न सहा ते अकरा या वयोगटाशी संबंधित असतील. त्यामध्ये अध्ययन, अध्यापन, विशेष बालकांच्या गरजा, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये व शैक्षणिक मूल्यमापनाचा समावेश असेल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/31OopSQ
via nmkadda