Advertisement
National Achievement Survey: देशभरात घेण्यात आलेल्या नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे ()म्हणजेच राष्ट्रीय संपादणूक सर्व्हक्षणामध्ये २४ राज्यांमधील जवळपास ९६ टक्के शाळा आणि ९२ टक्के विद्यार्थ्यांनी भाग घेतला. प्राथमिक अंदाजानुसार शिक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. हे शाळा आणि विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागाने देशभरात यशस्वीपणे पार पडले. आतापर्यंत २४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून मिळालेल्या प्राथमिक अंदाजानुसार, जवळपास ९६ टक्के शाळा आणि ९२ टक्के विद्यार्थ्यांनी सर्वेक्षणात भाग घेतल्याचे शिक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. तिसरी, पाचवी आणि आठवी इयत्तेतील विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या क्षमतांचे मूल्यमापन करणारे सर्वेक्षण दर तीन वर्षांनी केले जाते. याआधी शेवटचे सर्वेक्षण २०१२ मध्ये आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर ते २०२० मध्ये होणार होते. पण करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ते नोव्हेंबर २०२१ मध्ये आयोजित करण्यात आले. एनएएस २०२१ हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP) जाहीर झाल्यानंतरचे पहिले सर्वेक्षण आहे. देशातील शालेय विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेतील संपादणुकीचे मूल्यांकन करणे; तसेच देशातील शिक्षण प्रक्रियेचे मूल्यांकन करण्यासाठी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण करण्यात येते. एनएएस २०२१ मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२१ मधील आधारित मूल्यांकन प्रणालीचा वापर केला जाईल असे अधिकाऱ्याने सांगितले. शाळेत होणाऱ्या परीक्षेव्यतिरिक्त, विद्यार्थी, शिक्षक आणि शाळा यांचा विविध विषयांवरील दृष्टीकोन समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांची प्रश्नावली, शिक्षकांची प्रश्नावली आणि शालेय प्रश्नावली देखील मिळवण्यात आली. सर्वसमावेशक पद्धतीने शिक्षण प्रणाली समजून घेण्यासाठी शिक्षक प्रशिक्षण, ग्रामीण-शहरी, ऑनलाइन शिक्षणाच्या परिणामांबद्दल महत्वाची माहिती NAS २०२१ मधून समोर येईल असेही ते म्हणाले. जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय अशा तीन पातळ्यांवर ही सर्वेक्षण चाचणी घेतली जाते. सर्वेक्षणातील शाळा 'रँडम सॅम्पलिंग' पद्धतीने निवडण्यात आल्या आहेत. सर्वेक्षणात सुसूत्रता येण्यासाठी हे सर्वेक्षण देशभरात एकाच दिवशी करण्यात येते. यापूर्वी हे सर्वेक्षण २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात झाले होते. त्यानुसार २०२१-२२ शैक्षणिक वर्षातील नॅस सर्वेक्षण शुक्रवारी एकाच वेळी निवडलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांमध्ये झाले. करोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून हे सर्वेक्षण झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. लॉकडाऊनच्या आधी आणि नंतर शाळा बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर काय परिणाम होतो याचे मूल्यमापन करण्यासाठी शिक्षण व्यवस्थेचे मोजमाप करणे आवश्यक आहे. हे मूल्यांकन, वाचन आणि गणित यासारख्या मुख्य विषयांमध्ये सुरुवातीच्या इयत्तेत असलेल्या विद्यार्थ्यांवर केंद्रित आहे. यामुळे सुधारात्मक उपाय करता येतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. NAS चे निकाल जिल्हा रिपोर्ट कार्ड, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश अहवाल आणि राष्ट्रीय अहवालाच्या स्वरूपात तयार केले जाणार आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3HcPwqZ
via nmkadda