Advertisement
Education Policy: करोना काळात विद्यार्थ्यांचे झालेले 'लर्निंग लॉस' भरून काढण्यासाठी सरकार एक योजना तयार करत असल्याची माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. टाईम्स नाऊ समिट २०२१ वेळी टाइम्स नेटवर्कच्या ग्रुप एडिटर आणि टाइम्स नाऊ नवभारतच्या मुख्य संपादक नाविका कुमार यांच्याशी संवाद साधताना ते बोलत होते. बदलत्या काळात नवीन शिक्षण पद्धतींचा समावेश होत आहे. त्यामुळे सर्व वैचारिक अडथळे झुगारून नवीन शैक्षणिक धोरण तयार करण्यात आल्याचे प्रधान यावेळी म्हणाले. करोना काळात सुरु असलेल्या ऑनलाइन शिक्षणावर शिक्षणमंत्र्यांनी यावेळी भाष्य केले. गेली दोन वर्षे जगाने ज्या परिस्थितीत घालवली ती अकल्पनीय होती. कित्येक महिने आपण चार भिंतीत कैद होऊ असे कोणालाच वाटले नव्हते. शाळा, महाविद्यालये बंद होती. काही क्षेत्रांवर खूप मोठा परिणाम झाला. ज्यामध्ये शिक्षण क्षेत्र मुख्य असल्याचे धर्मेंद्र प्रधान म्हणाले. याची भरपाई करण्यासाठी सामाजिक संस्था, तज्ज्ञांशी बोलणी सुरू आहेत. आम्ही एक योजना तयार करत आहोत आणि शिक्षणातील नुकसान कसे भरून काढायचे याची योजना आखत असल्याचे केंद्रीय शिक्षणमंत्री यावेळी म्हणाले. शिक्षण हा राजकारणाचा विषय नाही भारतातील तरुणांनी ऑनलाइन शिक्षणाची नवीन पद्धत ज्या पद्धतीने अंगीकारली ते अभ्यासण्यासारखे आहे. जवळपास सर्व राज्यांनी त्यांचे अभ्यासक्रम डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणले आहेत. एक कोटी शिक्षकांनी नवीन शिक्षण पद्धत स्वीकारली. तसेच सामाजिक संस्था, कॉर्पोरेट हाऊसेस यांनी कंटेट तयार करण्यात मदत केल्याचे ते म्हणाले. करोना संकटाच्या काळात पंतप्रधान ई-विद्या योजनेला मोठा आधार मिळाला. तसेच आम्ही १६ लाख शाळांना नवीन शिक्षण पद्धतींकडे नेणार असल्याचे ते म्हणाले. करोना संकटाने आपल्याला अनुभव दिला आहे. आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांच्या बुद्धीवर विश्वास असून ते शिकण्याचे नुकसान भरून काढतील असा विश्वास धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यावेळी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (, NEP) वर त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी सविस्तर उत्तरे दिली. "शिक्षण हा राजकीय विषय नाही. देशात लोकशाही आहे. या शिक्षण क्षेत्रात या सरकारने एक नवा उपक्रम हाती घेतला आहे. ३४ वर्षांनंतर २०२० मध्ये नवीन शैक्षणिक धोरण आले. हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सर्व वैचारिक अडथळे मोडून तयार करण्यात आले आहे. २१ वे शतक हे ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्था असेल असेही ते म्हणाले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3F8eIge
via nmkadda