Advertisement
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद राज्यातील चार कृषी विद्यापीठांमधील विविध नऊ विद्याशाखांमधील पदवी अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले. अभ्यासक्रम प्रवेशासाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली असून,१८ नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे २०२१-२२ शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया लांबल्या. एमएचटी-सीईटीनिकालानंतर कृषी पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रियाही जाहीर करण्यात आली आहे. राज्यात १९१ महाविद्यालयांमधील १५ हजार ३३७ जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत. प्रवेश प्रक्रियेत ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना अर्ज करावा लागतो. https://ift.tt/3bX904d या वेबसाइटवर विद्यार्थ्यांना नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी करतेवेळी विद्यार्थ्यांस वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, अधिभार, प्रवर्गविषयक माहिती भरावयाची आहे. त्याच्याशी संबंधित मूळ कागदपत्रे स्कॅन करून वेबसाइटवर अपलोडकरावी लागणार आहेत. प्रवेश प्रक्रियेबाबतची माहिती पुस्तिका विद्यार्थ्यांना वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. माहिती पुस्तिकेतील माहितीच्या आधारे महाविद्यालयाचा दर्जा, वार्षिक शुल्काबाबत विद्यार्थ्यांना माहिती मिळते. उमेदवारांनी माहिती विचारात घेऊन विचारपूर्वक जास्तीत जास्त महाविद्यालयांचे विकल्प भरावेत,असे आवाहन महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने केले आहे. गुणवत्ता, प्रवर्ग आणि विकल्प या बाबी विचारात घेऊन निवड यादी जाहीर केली जाणार आहे. प्रवेश प्रक्रियेत एकूण तीन ऑनलाइन प्रवेश वाटप फेरी व एक स्पॉट अॅडमिशन राउंड असणार आहे. बारावी विज्ञान आणि एमएचटी-सीईटी, जेईई, नीट या सामायिक प्रवेश परीक्षांमध्ये घेतलेल्या गटानुसार उमेदवाराची पात्रता निश्चित करण्यात येते. बारावी विज्ञान शाखेमध्ये आरक्षित प्रवर्गाच्या विद्यार्थ्याला किमान ४० तर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्याला किमान ५० टक्के गुण आवश्यक असतात. सामाईक प्रवेश परीक्षेतील संबंधित गटातील पर्सेंटाइल तसेच इतर अधिभार विचारात घेतला जातो. यामध्ये शेतजमीन, व्यावसायिक, वैकल्पिक विषय, रासेयो, राष्ट्रीय छात्रसेना, क्रीडास्पर्धा, राज्यस्तरीय स्पर्धांचे गुण मिळून विद्यार्थ्याची गुणवत्ता निश्चित केली जाते. असे आहेत अभ्यासक्रम बीएस्सी ऑनर्स कृषी, बीएस्सी ऑनर्स उद्यानविद्या, बीएस्सी ऑनर्स वनविद्या, बीटेक कृषी अभियांत्रिकी, बीटेक अन्नतंत्रज्ञान, बीएस्सी ऑनर्स सामाजिक विज्ञान, बीटेक जैवतंत्रज्ञान, बीएफएस्सी मत्स्यशास्त्र, बीएस्सी ऑनर्स कृषी व्यवसाय व्यवस्थापन आदी अभ्यासक्रमांचा समावेश आहे. प्रवेश प्रक्रियेत कायमस्वरूपी विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये २० टक्के जागा संस्थास्तरीय कोट्यासाठी राखीव असतात. उर्वरित जागांमध्ये ३० टक्के राज्याचा तर ७० टक्के कोटा कृषी विद्यापीठाचा असतो. राज्यातील महाविद्यालये विद्यापीठ -- महाविद्यालयांची संख्या महात्मा फुले , राहुरी ७३ डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला ३७ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी ५४ डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली २७ .... १९१ -- पदवी अभ्यासक्रमाची महाविद्यालये १५,३३७ -- एकूण पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता ३७ -- शासकीय महाविद्यालयांची संख्या २ - अनुदानित महाविद्यालयांची संख्या १५२ - विनाअनुदानित महाविद्यालयांची संख्या
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3EYBvLI
via nmkadda